मनोरी खाडीवरील पुलासाठी निविदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2019 11:44 PM2019-07-28T23:44:29+5:302019-07-28T23:45:12+5:30

ग्रामस्थ आंदोलनाच्या पवित्र्यात : उद्योजक, बिल्डरांनी घेतल्या जमिनी

Tender for the bridge over Manori Bay | मनोरी खाडीवरील पुलासाठी निविदा

मनोरी खाडीवरील पुलासाठी निविदा

Next
ठळक मुद्देपूल झाल्यास येथील शहरीकरणासह गुन्हेगारीही वाढणार आहे. येथील शांतता व पर्यावरण नष्ट होणार आहे.

मीरा रोड / भार्इंदर : मनोरी खाडीवर पूल बांधण्यासाठी मुंबई महापालिकेने निविदा काढली असून त्याचा ग्रामस्थांच्या विविध संघटनांनी निषेध केला आहे. याआधी मेरी टाईम बोर्डाने जेट्टीच्या नावाखाली पुलाचे बांधकाम सुरू असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला होता. पण महापालिकेने पुलाच्या कामासाठी निविदा काढल्याने ग्रामस्थांनी पुन्हा आंदोनाचा पवित्रा घेतला आहे. मनोरी, गोराई, उत्तन भागात मोठ्या उद्योजकांपासून राजकारणी आणि बिल्डरांनी जमिनी घेतल्या असून त्यांच्या फायद्यासाठी सरकार, पालिका आणि राजकारणी पूल बांधण्याचा घाट सातत्याने घालत आल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

मुंबई हद्दीतील गोराई व मनोरी खाडीवर पूल बांधण्यास ग्रामस्थांसह विविध संघटनांचा तीव्र विरोध आहे. त्यासाठी सातत्याने गावकरी आंदोलन करत आले आहेत. त्यातच आता मुंबई महापालिकेने मनोरी खाडीवर पूल बांधण्यासाठी निविदा मागवल्या आहेत.
या आधी मेरी टाईम बोर्डाने दोन्ही ठिकाणी रो- रो सेवेच्या नावाखाली जेट्टी बांधण्याचे काम मंजूर केले. मनोरी येथील जेट्टीचे काम तर पुलासारखेच असल्याचा आरोप करत ते ग्रामस्थांनी बंद पाडले होते. गोराई येथील जेट्टीचे कामही बंद पाडण्यात आले होते .
मुंबई , ठाण्यातील बिल्डर, राजकारणी यांनी शहरीकरणाच्या नावाखाली बक्कळ फायद्यासाठी नामशेष केली आहेत. तर बडे उद्योजक, राजकारणी, बिल्डर आदींनी गेल्या अनेक वर्षांपासून गोराई, मनोरीसह भार्इंदरच्या उत्तन, डोंगरी, चौक, पाली, तारोडी गावाच्या धारावी बेटावरील गावे उध्वस्त करण्याचा घाट घातला आहे. येथील नैसर्गिक पर्यावरणासह जीवसृष्टीचे सरंक्षण व्हावे, भूमिपुत्रांचे आणि गावांचे अस्तित्व कायम टिकून रहावे, गावची संस्कृती कायम रहावी अशी भूमिका या विरोधामागे धारावी बेट बचावसह अन्य संघटनांनी सातत्याने मांडली आहे.
पूल झाल्यास येथील शहरीकरणासह गुन्हेगारीही वाढणार आहे. येथील शांतता व पर्यावरण नष्ट होणार आहे. अवास्तव बांधकामे फोफावणार आहेत. मूळात या ठिकाणी उद्योजक तसेच राजकारणी, बिल्डर आदींनी मोठ्या प्रमाणात जमिनी खरेदी केल्या असून त्या विकासासाठी मोकळ्या करण्यासाठी तसेच त्यांच्या फायद्यासाठी सरकार, पालिका आणि राजकारणी सातत्याने पूल बनवण्याचा घाट घालत असल्याचा आरोप समितीचे जोसेफ घोन्सालवीस, संदीप बुरकेन, ल्युड डिसोझा आदींनी केला आहे.

ग्रामस्थांच्या मागण्यांकडे सातत्याने डोळेझाक
सरकार, राजकारणी केवळ गोराई आणि मनोरी खाडीवर पूल बांधण्याचा सातत्याने उपद्व्याप करत आले आहेत. पण या गावां मध्ये अद्ययावत रु ग्णालय, महाविद्यालय , उद्याने - मैदाने, चांगली परिवहन सेवा आदी सुविधा देण्याची मात्र यांची दानत नाही. गाव परिसरातच स्थानिकांना रोजगार - उद्योगासाठी हे कोणतेही प्रयत्न करत नाहीत. अनेक वर्षांपासून सतत निवेदने - मागण्या करूनही त्या बद्दल हे अवाक्षर काढत नाहीत. परंतु रो - रो सेवा , पूल , पर्यटन आराखडा, एसईझेड आदींची ग्रामस्थांनी मागणी नसतानाही आमच्यावर लादत असल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे.
 

Web Title: Tender for the bridge over Manori Bay

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.