४४० व्होल्टचा झटका! ना पोल, ना कनेक्शन... ८२ हजारांचं पाठवलं वीज बिल, काय आहे हे प्रकरण?
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2025 16:45 IST2025-06-11T16:44:37+5:302025-06-11T16:45:25+5:30
पंचायत सचिवालयाच्या नावाने पोल, वायर, कनेक्शन नसतानाही ८२,३५४ रुपयांचं वीज बिल पाठवण्यात आलं आहे.

४४० व्होल्टचा झटका! ना पोल, ना कनेक्शन... ८२ हजारांचं पाठवलं वीज बिल, काय आहे हे प्रकरण?
उत्तर प्रदेशातील सहारनपूरमध्ये वीज विभागाचा मोठा निष्काळजीपणा समोर आला आहे. पंचायत सचिवालयाच्या नावाने पोल, वायर, कनेक्शन नसतानाही ८२,३५४ रुपयांचं वीज बिल पाठवण्यात आलं आहे. हे धक्कादायक प्रकरण नकूर विधानसभा मतदारसंघातील बहरामपुरा गावाचं आहे.
गावचे सरपंच विक्रम सिंह राठोड यांनी दिलेल्या माहितीनुसार, पंचायत भवनाचं बांधकाम २०२३ मध्ये सुरू झाले, पण वीज विभागाने एप्रिल २०२२ पासून बिल लावण्यास सुरुवात केली. आजपर्यंत या ठिकाणी विजेचा खांब किंवा वायर बसवण्यात आलेली नाही, वीज कनेक्शनसाठी अर्ज केला नाही, तरीही विभागाने वीज कनेक्शन सुरू असल्याचा कोणताही तपास न करता खोटा रिपोर्ट सादर केला.
डिसेंबर २०२४ मध्ये जेव्हा पहिल्यांदा माहिती मिळाली की, ७०,६९४ रुपयांचे बिल प्रलंबित आहे, तेव्हा त्यांनी वीज विभागाच्या कार्यालयात पोहोचून या निष्काळजीपणाचा निषेध नोंदवला. असं असूनही, बिलात कोणतीही दुरुस्ती करण्यात आली नाही किंवा अधिकाऱ्यांनी कोणतीही जबाबदारी घेतली नाही. बिल सतत वाढत आहे. बिलाची रक्कम ८२,३५४ रुपयांपर्यंत वाढली आहे.
या संपूर्ण प्रकरणाबाबत सरपंचांनी १६ डिसेंबर २०२४ रोजी कार्यकारी अभियंत्याकडे लेखी तक्रार दिली होती की हवेत चालणारे हे कनेक्शन त्वरित बंद करावं असं म्हटलं. परंतु आजपर्यंत विभागाने कोणतीही कारवाई केलेली नाही. विभागाची ही मनमानी आणि भ्रष्टाचार ही ग्रामपंचायतीला हानी पोहोचवण्याचं षड्यंत्र आहे. या अन्यायाविरुद्ध उच्च अधिकाऱ्यांकडे आवाज उठवतील आणि कायदेशीर मार्गही स्वीकारतील असं म्हटलं आहे. तसेच वीज विभागाच्या या निष्काळजीपणामुळे संपूर्ण गावात संताप पसरला आहे.