विरोधी पक्षाच्या आमदारांची भाजपकडून होणार शिकार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2020 04:38 IST2020-03-17T04:37:31+5:302020-03-17T04:38:57+5:30
राज्यसभेत तीन जास्तीचे उमेदवार पाठवण्याचे भाजपाचे प्रयत्न; महाराष्ट्र, हरयाणात मात्र घेतली नाही जोखीम

विरोधी पक्षाच्या आमदारांची भाजपकडून होणार शिकार?
- हरीश गुप्ता
नवी दिल्ली : राज्यसभेच्या द्वैवार्षिक निवडणुकीत काही जास्तीच्या जागा मिळविण्यासाठी भाजप विरोधी पक्षांतील आमदारांची शिकार करण्याच्या जोरदार प्रयत्नांत आहे. १७ राज्यांत ५६ जागांसाठी २६ मार्च रोजी निवडणूक होत आहे. भाजपला आपल्या आमदारांच्या संख्याबळावर १४ जागा जिंकता येणार आहेत. परंतु, जास्तीच्या तीन जागा काँग्रेसकडून हिसकावण्यासाठी त्याचे शिकारीचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. हरयाणा आणि महाराष्ट्र वगळता भाजपने जवळपास सगळ््या राज्यांत काँग्रेसचे आमदार जिंकून व विरोधकांच्या मतांत फूट पाडून जागा जिंकता येईल यासाठी एकेक जास्तीचा उमेदवार उभा केला आहे.
गुजरातमध्ये भाजपचा जास्तीचा तिसरा उमेदवार जिंकावा यासाठी काँग्रेसच्या पाच आमदारांनी राजीनामे दिले. या शिवाय मध्यप्रदेश आणि राजस्थानातही भाजपने जास्तीचा तिसरा उमेदवार उभा केला आहे. मध्यप्रदेशमध्ये काँग्रेसच्या २२ आमदारांनी पक्षाचाच राजीनामा दिल्यामुळे तेथे भाजपचा तिसरा उमेदवार जिंकून येण्याची अपेक्षा आहे. हे २२ आमदार सध्या बंगळुरूत मुक्कामाला आहेत. परंतु, आता भाजपची नजर गुजरात व राजस्थानातील जास्तीचा तिसरा उमेदवार जिंकून आणण्याकडे रोखलेली आहे. राजस्थानात भाजपला तीनपैकी फक्त एक जागा मिळण्याची अपेक्षा आहे. परंतु, आता काँगे्रसकडून दुसरी जागाही हिसकावता येईल अशी त्याला आशा आहे.
गुजरात आणि मध्यप्रदेशमध्ये भाजपला परिस्थिती अनुकूल आहे. परंतु, मध्यप्रदेशच्या तुलनेत काँग्रेसचे नेतृत्व आमचा पक्ष राजस्थानात एकसंध असल्याचे चित्र निर्माण करीत आहे. मध्यप्रदेशातील सरकार कोणत्याही दिवशी कोसळण्याची चिन्हे आहेत. हरयाणातही भाजपने जास्तीचा उमेदवार उभा करण्याचा मोह टाळला आहे. तेथे भूपिंदर सिंह हुडा हे काँग्रसेचे उमेदवार आहेत.
विशेष म्हणजे हरयाणा व महाराष्ट्रात भाजपने जास्तीचा उमेदवार उभा केलेला नाही. भाजपला महाराष्ट्रात तीन जागा जिंकता येणार असून तेवढेच उमेदवार त्याने उभे केले आहेत. महाराष्ट्रात भाजपने आमदारांची शिकार करण्याचे टाळले आहे कारण तेथे शरद पवार यांच्याशी आपली गाठ आहे व तसे काही केल्यास पक्षासाठी परिस्थिती आणखी गुंतागुंतीची होऊ शकते याची त्याला कल्पना आहे. उद्धव ठाकरे सरकार दुखावले जाऊ नये अशी नेतृत्वाची भूमिका आहे.