Mamata Banerjee : "देशात पुन्हा लॉकडाऊन लागू शकतो, ४०० चा सिलिंडर १,१०० रुपयांवर..."; ममता बॅनर्जी संतापल्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2026 10:39 IST2026-03-27T10:36:48+5:302026-03-27T10:39:59+5:30
Mamata Banerjee : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मोदी सरकार आणि निवडणूक आयोगावर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे.

Mamata Banerjee : "देशात पुन्हा लॉकडाऊन लागू शकतो, ४०० चा सिलिंडर १,१०० रुपयांवर..."; ममता बॅनर्जी संतापल्या
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मोदी सरकार आणि निवडणूक आयोगावर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. पश्चिम बर्धमान येथील निवडणूक रॅलीला संबोधित करताना ममता बॅनर्जी यांनी देशात पुन्हा लॉकडाऊन लागण्याची शक्यता वर्तवली. भाजपाची कोणतीही रणनीती आपल्याला लढण्यापासून रोखू शकत नाही, असंही त्या यावेळी म्हणाल्या.
ममता बॅनर्जी म्हणाल्या की, "ते पुन्हा लॉकडाऊन लावून लोकांना घरांमध्ये कैद करू शकतात. २०२१ मध्येही आम्ही लॉकडाऊनच्या काळात निवडणूक लढवली आणि जिंकली होती. मी कोणत्याही परिस्थितीत लढण्यासाठी तयार आहे." तसेच एलपीजी सिलिंडरची टंचाई आणि वाढत्या किमतींबाबतही चिंता व्यक्त केली.
सिलिंडर आता १,१०० रुपयांवर
पूर्वी ४०० रुपयांना मिळणारा सिलिंडर आता १,१०० रुपयांवर पोहोचला आहे. सिलिंडर बुकिंग केल्यानंतर तो मिळण्यासाठी २५-३५ दिवस लागत असल्याच्या परिस्थितीवर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. यामुळे लोकांना पुन्हा स्वयंपाकाच्या जुन्या पद्धतींकडे वळण्यास भाग पाडलं जात असल्याचं देखील ममता म्हणाल्या.
ममता बॅनर्जी यांनी 'SIR' प्रक्रियेद्वारे मतदारांची नावं वगळण्यावरून भाजपा आणि निवडणूक आयोग यांच्यात संगनमत असल्याचा आरोप केला. त्यांनी भाजपाचा उल्लेख 'वॉशिंग मशीन' असा केला आणि आरोप केला की, यातून खऱ्या मतदारांची (हिंदू, मुस्लिम, शीख, ख्रिश्चन, एससी/एसटी) नावं हटवली जात आहेत. ज्यांची नावं हटवण्यात आली आहेत, त्यांना ट्रिब्यूनलमध्ये लढण्यासाठी तृणमूल काँग्रेस मोफत कायदेशीर मदत देईल आणि प्रत्येक भागात कॅम्प लावून मदत करेल असं आश्वासनही त्यांनी दिलं.
"भाजपा सरकार ऑगस्ट किंवा सप्टेंबरपर्यंत पडेल"
केंद्रातील भाजपा सरकार या वर्षी ऑगस्ट किंवा सप्टेंबरपर्यंत पडेल, असा दावा ममता बॅनर्जी यांनी केला आहे. निवडणूक आयोगाने भाजपाचे एजंट म्हणून काम करू नये, असा इशाराही त्यांनी दिला. तसेच मतदानाच्या आणि मतमोजणीच्या दिवशी कोणत्याही प्रकारच्या दडपशाहीविरोधात समर्थकांनी एकत्र येण्याचं आवाहन त्यांनी केलं.