वरुण गांधींनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट; अखेर 'राजकीय वनवास' संपणार? चर्चांना उधाण...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2026 13:01 IST2026-03-17T13:00:15+5:302026-03-17T13:01:12+5:30
वरुण गांधी काही काळापासून भाजपच्या भूमिकांवर टीका करत असल्याने पक्षासोबत त्यांचे संबंध ताणले गेले होते.

वरुण गांधींनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट; अखेर 'राजकीय वनवास' संपणार? चर्चांना उधाण...
नवी दिल्ली: गेल्या काही काळापासून सक्रीय राजकारणापासून दूर असलेले भाजपचे माजी खासदार वरुण गांधी यांनी मंगळवारी(दि.17) कुटुंबासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात विविध तर्क-वितर्कांना उधाण आले असून, वरुण गांधी यांचा ‘राजकीय वनवास’ अखेर संपणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
कुटुंबासह घेतली पंतप्रधानांची भेट
उत्तर प्रदेशातील पीलीभीतचे माजी खासदार वरुण गांधी यांनी पत्नी आणि मुलीसह पंतप्रधान मोदी यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी पंतप्रधानांचे आशीर्वाद आणि मार्गदर्शन घेतल्याचे सांगितले. वरुण गांधी यांनी या भेटीचा फोटो सोशल मीडियावर शेअर करत पंतप्रधानांविषयी कौतुकाचे शब्द व्यक्त केले. त्यांनी लिहिले की, आपल्या व्यक्तिमत्त्वात पितृतुल्य स्नेह आणि संरक्षणाची भावना आहे. ही भेट देशासाठी आपले नेतृत्व अधिक दृढ असल्याचा विश्वास देते.
भेटीमागे बंगाल निवडणुकीचा संदर्भ?
ही भेट अशा वेळी झाली आहे, जेव्हा पश्चिम बंगालसह पाच राज्यांमध्ये निवडणुकीची घोषणा झाली आहे. त्यामुळे या भेटीचा बंगाल निवडणुकीशी संबंध जोडला जात आहे. विशेष म्हणजे, वरुण गांधी यांची पत्नी मूळची बंगाली असल्यामुळे भाजप त्यांचा वापर बंगालमधील प्रचारासाठी करू शकते, अशी चर्चा सुरू आहे. भाजप या वेळी बंगालमध्ये सत्तेत परतण्यासाठी आक्रमक रणनीती आखत आहे.
परिवार सहित श्रद्धेय प्रधानमंत्री श्री @narendramodi जी से मिलकर उनका आर्शीर्वाद और मार्गदर्शन पाने का सौभाग्य प्राप्त हुआ।
— Varun Gandhi (@varungandhi80) March 17, 2026
आपके आभामंडल में अद्भुत पितृवत स्नेह और संरक्षण का भाव है।
आपसे हुई भेंट इस विश्वास को और भी दृढ़ बना देती है कि आप देश और देशवासियों के सच्चे अभिभावक… pic.twitter.com/RPSuJlbsrq
भाजपशी दुरावा संपणार?
वरुण गांधी काही काळापासून भाजपच्या भूमिकांवर टीका करत असल्याने पक्षासोबत त्यांचे संबंध ताणले गेले होते. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने पीलीभीत मतदारसंघातून त्यांचा तिकीट कापून जितिन प्रसाद यांना उमेदवारी दिली होती. जितिन प्रसाद सध्या खासदार असून केंद्र सरकारमध्ये मंत्रीही आहेत. यानंतर गांधी कुटुंब आणि भाजप यांच्यातील दुरावा स्पष्टपणे दिसून आला होता.
मेनका गांधींचाही पराभव
वरुण गांधी यांच्या आई आणि माजी केंद्रीय मंत्री मेनका गांधी यांना 2024 मध्ये सुलतानपूर मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली होती, मात्र त्यांना पराभव पत्करावा लागला. या पराभवानंतर गांधी कुटुंबाचे पक्षातील महत्त्व कमी झाल्याची चर्चा होती.
राजकीय पुनरागमनाची चिन्हे?
पंतप्रधान मोदींसोबतच्या भेटीनंतर वरुण गांधी यांनी व्यक्त केलेले सकारात्मक विचार आणि सोशल मीडियावरील पोस्ट पाहता, दोघांमधील राजकीय अंतर कमी होत असल्याचे संकेत मिळत आहेत. यामुळे आगामी काळात वरुण गांधी यांना पुन्हा पक्षात महत्त्वाची भूमिका दिली जाऊ शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
आगामी निवडणुका आणि रणनीती
भाजप सध्या राष्ट्रीय तसेच उत्तर प्रदेशातील संघटनात्मक बदलांच्या तयारीत आहे. उत्तर प्रदेशात पुढील वर्षी विधानसभा निवडणुका होणार आहेत, तर यावर्षी ऑक्टोबरमध्ये राज्यसभा निवडणुका देखील होणार आहेत. या पार्श्वभूमीवर वरुण गांधी यांची सक्रियता वाढणे हे भाजपच्या व्यापक निवडणूक रणनीतीचा भाग असू शकते.