मुंडन सोहळ्यावरून परतताना पिकअपला अपघात; तीन मुलांसह सहा जण ठार, अनेक गंभीर जखमी!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2026 18:01 IST2026-03-27T18:00:33+5:302026-03-27T18:01:47+5:30
Uttar Pradesh Kaushambi Accident: प्रयागराज येथे मुंडन समारंभ आटोपून आनंदाने घरी परतणाऱ्या फतेहपूरच्या भाविकांवर काळाने भीषण घाला घातला आहे. कौशांबीतील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक २ वर भाविकांच्या पिकअप व्हॅनला भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत ६ जणांचा मृत्यू झाला असून, मृतांमध्ये ३ लहान मुलांचा समावेश असल्याने परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.

मुंडन सोहळ्यावरून परतताना पिकअपला अपघात; तीन मुलांसह सहा जण ठार, अनेक गंभीर जखमी!
उत्तर प्रदेशातील कौशांबी जिल्ह्यातून एक अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली आहे. प्रयागराज येथे मुंडन सोहळ्यासाठी गेलेल्या भाविकांच्या पिकअप वाहनाचा भीषण अपघात झाला असून, यामध्ये सहा जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये तीन लहान मुलांचा समावेश असल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, फतेहपूर जिल्ह्यातील करौली गावातील सुमारे १८ जणांचा एक गट एका लहान मुलाच्या मुंडन करण्यासाठी पिकअप वाहनाने प्रयागराजला गेला होता. समारंभ उरकून आनंदाने गावाकडे परतत असताना, सैनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अतासराई जवळ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक २ वर त्यांच्या वाहनाला भीषण अपघात झाला. अपघाताची तीव्रता इतकी भीषण होती की, पिकअप वाहनाचा अक्षरशः चक्काचूर झाला.
पोलीस तपास सुरू
स्थानिक नागरिक आणि महामार्ग पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. या घटनेत एकूण सहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. अनेक प्रवासी गंभीर जखमी असून, त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींमध्ये अनेकांची प्रकृती चिंताजनक असल्याने मृतांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे. या प्रकरणी स्थानिक पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली. वाहनाचा अतिवेग आणि त्यावरील नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाला असावा असा प्राथमिक अंदाज आहे. पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.
मुख्यमंत्री शोकाकूळ
या घटनेवर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शोक व्यक्त केले. त्यांनी मृतांच्या कुटुंबीयांप्रती आपल्या संवेदना प्रकट केल्या असून, जिल्हा प्रशासनाला जखमींना सर्वोत्तम उपचार पुरवण्याचे आणि घटनास्थळी सर्वतोपरी मदत करण्याचे निर्देश दिले आहेत. दरम्यान, या भीषण अपघातामुळे करौली गावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.