इराणी हल्ल्यात मुंबईत राहणाऱ्या इंजिनिअरचा मृत्यू; १५ भारतीय थोडक्यात बचावले, समुद्रात घेतली उडी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2026 11:17 IST2026-03-13T11:14:39+5:302026-03-13T11:17:03+5:30
हा हल्ला इराकच्या बसरा येथील खोर अल जुबैर बंदराजवळ झाला. एका जहाजातून दुसऱ्या जहाजात माल भरण्याचं काम सुरू होते तेव्हा हा हल्ला झाला

इराणी हल्ल्यात मुंबईत राहणाऱ्या इंजिनिअरचा मृत्यू; १५ भारतीय थोडक्यात बचावले, समुद्रात घेतली उडी
मुंबई - अमेरिकन तेल टँकर सेफसी विष्णूवर बुधवारी इराणने हल्ला केला. या हल्ल्यात टँकरवर काम करणाऱ्या एका भारतीय इंजिनिअरचा मृत्यू झाला. या मृत व्यक्तीचे नाव नंदन प्रसाद सिंह आहे. जे मूळचे बिहारचे होते. गेल्या काही वर्षापासून ते कुटुंबासह मुंबईतील कांदिवलीत राहायला आले होते. त्यांच्या पश्चात् पत्नी आणि २ मुले आहेत. नंदन सिंह आधी नियोम मॅरिटाइम, यूनाइटेड ओशन शिप मॅनेजमेंट, बर्नार्ड शुल्टे शिप मॅनेजमेंट, सॅमसन मॅरिटाइम आणि शिपिंग कॉर्पोरेशनमध्ये कामाला होते.
नंदन सिंह यांचे मेहुणे चंदन कुमार यांनी सांगितले की, नंदन यांच्या मृत्यूबाबत त्यांच्या कंपनीकडून कळले. शिपिंग मंत्रालयाने आम्हाला काही माहिती दिली नाही. नंदन सिंह यांचा मुलगा मुंबईबाहेर राहतो, तो शुक्रवारी पोहचेल तेव्हा वडिलांवर अंत्यसंस्कार केले जातील. नंदन सिंह यांच्या जाण्याचा आम्हाला मोठा धक्का बसला आहे असं त्यांनी सांगितले. तर भारतीय दूतावासाने मृत नंदन सिंह यांच्या कुटुंबाप्रती सहवेदना व्यक्त केली.
कधी अन् कसा झाला हल्ला?
हा हल्ला इराकच्या बसरा येथील खोर अल जुबैर बंदराजवळ झाला. एका जहाजातून दुसऱ्या जहाजात माल भरण्याचं काम सुरू होते तेव्हा हा हल्ला झाला. या टँकरमध्ये जवळपास ४८ हजार मेट्रिक टन नेफ्था भरले जात होते. एक अज्ञात वस्तू त्याला धडकली असं शिपिंग मंत्रालयाकडून सांगण्यात आले. सुरुवातीच्या रिपोर्टमध्ये या जहाजाला सफेद रंगाची विना ड्रायव्हर स्पीडबोटने हल्ला केल्याचे समोर आले. या स्पीड बोटीत विस्फोटके होती. जहाज उजव्या बाजूने आले आणि जोरात धडकले. त्यामुळे जहाजावर भीषण आग लागली.
हल्ल्यातून २७ जण थोडक्यात वाचले
दरम्यान, या जहाजातील सर्व सदस्य जहाज सोडून सुरक्षेसाठी पाण्यात उडी घेतली. त्यानंतर काही अंतरावर एक STS टगद्वारे त्यांना वाचवण्यात आले. इराकच्या कोस्ट गार्डने २७ जणांना सुरक्षित वाचवले. त्यात १५ भारतीय आणि १२ फिलिपिनो नागरिकांचा समावेश होता. या सर्वांना सुरक्षित बसरा बंदरावरील एका छोट्या बेटावर पोहचवण्यात आले. बगदाद येथे भारतीय दूतावासाने ही माहिती सोशल मीडियावर शेअर केली. ज्यात ११ मार्च २०२६ रोजी मार्शल आयरलँड्स झेंडा असणाऱ्या अमेरिकन तेल टँकर सेफसी विष्णूवर बसराजवळ हल्ला झाला. ज्यात एका भारतीय क्रू मेंबरचा जीव गेला तर इतर १५ भारतीयांना सुरक्षित ठिकाणी पोहचवण्यात आले आहे.