आधी बंधक बनवलं, मग २५ दिवस जेलमध्ये टाकलं; भारतीय इंजिनिअरनं सांगितला इराणमधून सुटकेचा थरार
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2026 19:54 IST2026-04-01T19:53:03+5:302026-04-01T19:54:27+5:30
दुसऱ्याच दिवशी अमेरिका आणि इस्रायलने इराणवर हल्ला केला. बंदर अब्बासमधील इराणी नौदल तळ हे पहिले लक्ष्य होते असं केतनने सांगितले

आधी बंधक बनवलं, मग २५ दिवस जेलमध्ये टाकलं; भारतीय इंजिनिअरनं सांगितला इराणमधून सुटकेचा थरार
गाझियाबाद -दिवसाला २०० हून अधिक बॉम्ब अन् मिसाइल हल्ले...चहुबाजूने विध्वंस आणि इराणच्या सर्वात मोठ्या नेवी पोर्ट बंदरावर १२ हून अधिक नौका जळताना डोळ्यादेखत पाहिल्या. केतन आणि त्याच्या सहकाऱ्याला जहाजावर बंधक बनवले होते. त्यानंतर या लोकांना जेलमध्ये टाकले. इराणने या लोकांवर डिझेल तस्करीचा आरोप लावला. परंतु काही दिवसांतच कोर्टात त्यांना जामीन मिळाला. २५ दिवस इराणमध्ये राहिलेल्या केतन मेहताने भारतात पोहचल्यावर देवाचे आभार मानले.
केतन मेहता आपल्या १८ सहकाऱ्यांसोबत बंदर अब्बास बंदराजवळील आंतरराष्ट्रीय सागरी हद्दीत एक जहाज दुरुस्त करण्यासाठी गेले होते. ८ डिसेंबर २०२५ रोजी IRGC च्या जवानांनी अंदाधुंद गोळीबार करत जहाजाजवळ येऊन सर्वांना ओलीस ठेवले. जहाजावरील सामान आणि फोन समुद्रात फेकून देण्यात आले. सुरुवातीला त्यांना वाटले की काहीतरी गैरसमज झाला आहे आणि लवकरच सर्व काही ठीक होईल म्हणून केतन यांनी आपल्या कुटुंबाला ही गोष्ट सांगितली नाही. जहाजावरील सर्व कर्मचाऱ्यांना ६ जानेवारी २०२६ पर्यंत एका केबिनमध्ये ओलीस ठेवण्यात आले होते. या काळात त्यांना जहाजावर उपलब्ध असलेल्या अन्नावर जगावे लागले. जहाजावर इराणी आयआरजीसीचे जवान नेहमीच तैनात होते.
६ जानेवारी रोजी जहाजावरील सर्व १५ लोकांना अटक करून तुरुंगात टाकण्यात आले. तुरुंगात ५० दिवस काढल्यानंतर आमची जामिनावर सुटका झाली. तुरुंगातून सुटल्यानंतर सर्वांना बंदर अब्बास बंदराजवळील एका हॉटेलमध्ये ठेवण्यात आले, तेव्हा 'आसमान से गिरे खजूर मे अटकेट' ही म्हण खरी ठरली. २७ फेब्रुवारी रोजी, या सर्व जहाजांच्या अभियंत्यांना आणि कप्तानांना तुम्हाला दुसऱ्या दिवशी भारतात परतण्याची तिकिटे मिळतील असं सांगण्यात आले. पण दुसऱ्याच दिवशी अमेरिका आणि इस्रायलने इराणवर हल्ला केला. बंदर अब्बासमधील इराणी नौदल तळ हे पहिले लक्ष्य होते असं केतनने सांगितले.
दररोज १००-२०० बॉम्ब पडत होते
अमेरिका आणि इस्रायलने बंदर अब्बास नौदल तळावर दररोज १००-२०० बॉम्ब आणि क्षेपणास्त्रे टाकली असावीत. हॉटेलवर क्षेपणास्त्र आदळल्यास सुटका होईल या आशेने आम्ही दररोज आठव्या मजल्यावरून पहिल्या मजल्यावर धावत असू. आपल्या हॉटेलच्या आसपास होणाऱ्या भीषण बॉम्बहल्ल्यामुळे केतन प्रचंड भयभीत झाला होता. यावेळी गाझियाबादमधील त्याचे कुटुंब केतनच्या सुटकेसाठी रात्रंदिवस प्रार्थना करत होते. केतनचे हॉटेल बंदर अब्बास नौदल तळापासून अवघ्या ५००-६०० मीटर अंतरावर होते. हॉटेलमध्ये असल्याने त्यांना इराणसोबतच्या अमेरिका-इस्रायल युद्धाबद्दल काहीच कल्पना नव्हती. जेव्हा अमेरिकेने इराणवर हल्ला केला आणि पहिल्याच दिवशी बंदर अब्बास नौदल तळावर तैनात असलेल्या एका नौदल जहाजाला लक्ष्य केले, तेव्हा केतन यांना धोक्याची जाणीव झाली. हॉटेलमध्ये असताना बंदर अब्बासमधील विविध लष्करी तळांवर अमेरिकेच्या दिशेने अंदाजे २,०००-३,००० बॉम्ब आणि क्षेपणास्त्रे डागण्यात आली. या बॉम्बहल्ल्यात बंदर अब्बास येथे तैनात असलेली चार ते सहा जहाजे पूर्णपणे उद्ध्वस्त झाली. सर्वत्र विध्वंस झाला होता. हल्ल्याच्या वेळी बंदर अब्बास तळावर एक हजाराहून अधिक लोक उपस्थित होते असा अनुभव केतनने सांगितला.
रस्ते मार्गाने २१ मार्चला निघाले, अन...
दरम्यान, इराणमध्ये अडकलेल्या २ हजार विद्यार्थ्यांसह केतन मेहतासह १६ लोकांना भारतात आणणं आव्हानात्मक बनले. आम्ही बंदर अब्बासपासून अर्मेनियापर्यंत बसने सुमारे १,९०० किलोमीटरचा प्रवास केला. प्रवासादरम्यान आजूबाजूच्या डोंगरांमधून स्फोटांचे आवाज सतत ऐकू येत होते. भीतीच्या छायेत कसेबसे आम्ही अर्मेनियाच्या सीमेवर पोहोचलो. या काळात सातत्याने भारतीय दूतावासाच्या संपर्कात होतो असं केतनने सांगितले.