IAS रिंकू सिंह राही यांचा राजीनामा; वकिलांसमोर उठाबशा काढल्याने चर्चेत आलेले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2026 17:44 IST2026-03-31T16:57:01+5:302026-03-31T17:44:46+5:30
२००९ साली एक मोठा घोटाळा उघडकीस आणल्याने रिंकू सिंह यांना गुंडांनी ७ गोळ्या मारल्या होत्या.

IAS रिंकू सिंह राही यांचा राजीनामा; वकिलांसमोर उठाबशा काढल्याने चर्चेत आलेले...
लखनऊ : उत्तर प्रदेश कॅडरचे IAS अधिकारी रिंकू सिंह राही यांनी मंगळवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला. आपल्या राजीनाम्याच्या पत्रात त्यांनी राज्य सरकारवर दीर्घकाळ कोणतीही पोस्टिंग किंवा काम न दिल्याचा आरोप केला आहे. आता राज्य सरकार त्यांच्या राजीनाम्यावर काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
उठाबशा काढल्याने चर्चेत आलेले...
रिंकू सिंह राही हे २०२२ बॅचचे आयएएस अधिकारी असून, शाहजहांपूर येथे एसडीएम असताना वकिलांसमोर उठाबशा काढल्याने चर्चेत आले होते. त्या घटनेनंतर राज्य सरकारने त्यांना राजस्व परिषदेला अटॅच केले. मात्र, तेव्हापासून त्यांना नवीन पोस्टिंग देण्यात आली नाही, असा त्यांचा आरोप आहे. याच कारणामुळे त्यांनी अखेर राजीनामा दिला.
गुंडांच्या ७ गोळ्या खाल्ल्या...
रिंकू सिंह राही हे आयएएस होण्यापूर्वी यूपी पीसीएस परीक्षा उत्तीर्ण झाले होते आणि समाज कल्याण अधिकारी म्हणून कार्यरत होते. २००९ मध्ये मुजफ्फरनगर येथे समाज कल्याण अधिकारी असताना त्यांनी एका मोठ्या घोटाळ्याचा पर्दाफाश केला होता. त्यानंतर त्यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला होता. त्या हल्ल्यात त्यांना सात गोळ्या लागल्या होत्या. गंभीर जखमी असूनही ते वाचले आणि त्यांनी भ्रष्टाचाराविरुद्धची लढाई सुरू ठेवली. नोकरी करत असतानाच त्यांनी UPSC ची तयारी सुरू ठेवली आणि २०२२ मध्ये ते आयएएस झाले. योगायोगाने त्यांना उत्तर प्रदेश कॅडर मिळाले.
उत्तर प्रदेश –
— Sachin Gupta (@Sachingupta) July 29, 2025
शाहजहांपुर में IAS ऑफिसर रिंकू सिंह ने कान पकड़कर वकीलों के सामने उठक–बैठक लगाई, माफी मांगी। ऑफिसर ने वकीलों से कहा था कि तहसील परिसर में गंदगी करने वालों से उठक–बैठक लगवा देंगे। इस बयान से वकीलों में आक्रोश था, वो आंदोलन कर रहे थे। pic.twitter.com/eXLpRffVPZ
एसडीएम असताना वकिलांसमोर उठाबशा
आयएएसच्या प्रशिक्षणानंतर त्यांना उत्तर प्रदेशात फील्ड ट्रेनिंगसाठी पाठवण्यात आले. शाहजहांपूर जिल्ह्यातील तिलहर तहसीलचे एसडीएम म्हणून त्यांची नियुक्ती झाली. ते जॉईन होण्यासाठी गेले असताना तहसीलमध्ये वकिलांचे आंदोलन सुरू होते. ते वकिलांना भेटण्यासाठी गेले आणि त्यावेळी त्यांनी वकिलांसमोर उठाबशा काढल्या. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि ते चर्चेत आले.