राहुल गांधींच्या भाषणातील 'हत्या' शब्दासह 24 शब्द कामकाजातून वगळले; काँग्रेसचा निषेध
By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2023 05:40 PM2023-08-10T17:40:12+5:302023-08-10T17:40:52+5:30
सत्ताधाऱ्यांच्या आक्षेपानंतर राहुल गांधी यांच्या भाषणातील एकूण 24 शब्द कामकाजातून वगळण्यात आले आहेत. याबाबत काँग्रेसने निषेध व्यक्त केला आहे.
![unparliamentary words removed from rahul gandhi speech congress said what did you say wrong | राहुल गांधींच्या भाषणातील 'हत्या' शब्दासह 24 शब्द कामकाजातून वगळले; काँग्रेसचा निषेध unparliamentary words removed from rahul gandhi speech congress said what did you say wrong | राहुल गांधींच्या भाषणातील 'हत्या' शब्दासह 24 शब्द कामकाजातून वगळले; काँग्रेसचा निषेध](https://d3pc1xvrcw35tl.cloudfront.net/images/840x630/rahul-gandhi-gave-flying-kiss_2023081064579.jpg)
राहुल गांधींच्या भाषणातील 'हत्या' शब्दासह 24 शब्द कामकाजातून वगळले; काँग्रेसचा निषेध
नवी दिल्ली : मणिपूर प्रकरण, दिल्ली सेवा विधेयक यासह अनेक मुद्द्यांमुळे संसदेचे पावसाळी अधिवेशन आतापर्यंत वादळी ठरले आहे. दरम्यान, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बुधवारी भाजप सरकारविरोधातील अविश्वास प्रस्तावावरील चर्चेदरम्यान मणिपूरचा मुद्दा उपस्थित करत मणिपूरमध्ये भारत मातेची हत्या झाली, असे वक्तव्य केले. राहुल गांधी यांच्या वक्तव्यानंतर सत्ताधाऱ्यांनी आक्षेप घेतला. सत्ताधाऱ्यांच्या आक्षेपानंतर राहुल गांधी यांच्या भाषणातील एकूण 24 शब्द कामकाजातून वगळण्यात आले आहेत. याबाबत काँग्रेसने निषेध व्यक्त केला आहे.
राहुल गांधी यांनी संसदेत एकूण 37 मिनिटे भाषण केले. अविश्वास प्रस्तावादरम्यान दुपारी 12:09 ते दुपारी 12:46 पर्यंत राहुल गांधी यांनी भाषण केले. म्हणजेच त्यांनी एकूण 37 मिनिटे सभागृहात आपले म्हणणे मांडले. आपल्या भाषणात मणिपूरच्या मुद्द्यावर राहुल गांधी यांनी 15 मिनिटे 42 सेकंद भाषण केले. त्या भाषणातील 24 शब्द संसदेच्या कामकाजातून वगळण्यात आले आहे.
मोदी आतापर्यंत मणिपूरला गेले नाहीत, मोदींसाठी मणिपूर भारतात नाहीच, अशी टाकी देखील राहुल यांनी केली. राहुल गांधीनी आपल्या भाषणात हत्या हा शब्द 15 वेळा वापरला होता. तसेच केंद्रीय मंत्री किरेन रिजीजू यांनी देखील हत्या हा शब्द वापरला होता, तो संसदेच्या कामकाजातून वगळण्यात आला आहे. हत्या शब्दाबरोबर कत्ल, देशद्रोही शब्द दोनदा, आणि मर्डर हत्यारा, हे शब्द एकदा वापरण्यात आला होता. हे सर्व शब्द कामकाजातून वगळण्यात आले आहेत.
अधीर रंजन यांनी लोकसभा अध्यक्षांना पत्र
काँग्रेसचे नेते अधीर रंजन यांनी लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहिले आहे. संसद टीव्हीवर राहुल गांधी यांचे भाषण कापून दाखवल्याबद्दल नाराजी व्यक्त करत केली. तसेच संसद टीव्ही भेदभाव करत असल्याचा गंभीर आरोप अधीर रंजन यांनी केला आहे. याशिवाय, काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी राहुल गांधींना पूर्णवेळ संसद टीव्हीने दाखवले नसल्याचा दावा काँग्रेसकडून (Congress) करण्यात येत आहे.