पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दिल्लीत पाऊल ठेवताच केंद्र सरकार आणि दिल्ली पोलिसांवर जोरदार निशाणा साधला आहे. चाणक्यपुरी येथील 'बंग भवन' येथे जाऊन त्या बंगालमधून आलेल्या लोकांची भेट घेणार आहेत आणि दिल्ली पोलिसांकडून त्यांच्यावर होत असलेल्या अन्यायाची माहिती घेणार आहेत. "बंगालला जाणीवपूर्वक बदनाम केलं जात असून केंद्रीय यंत्रणा भाजपाच्या इशाऱ्यावर काम करत आहेत" असा थेट आरोप ममतांनी केला.
"जेव्हा केंद्रीय गृहमंत्री पश्चिम बंगालमध्ये येतात, तेव्हा राज्य सरकार त्यांचं स्वागत 'रेड कार्पेट' टाकून करतं. मात्र जेव्हा बंगालचे लोक किंवा त्यांचे लोकप्रतिनिधी दिल्लीत येतात, तेव्हा त्यांना 'ब्लॅक कार्पेट'सारखी वागणूक दिली जाते" असं म्हणत टीकास्त्र सोडलं आहे. तसेच ममतांनी याला अपमानास्पद आणि पक्षपातीपणाचे लक्षण म्हटलं असून, हा मुद्दा केवळ सन्मानाचा नसून लोकशाही आणि समान वागणुकीचा असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
या अन्यायाविरुद्ध आणि छळाविरुद्ध आपण आवाज उठवणार असल्याचं त्यांनी सांगितलं. केंद्र आणि दिल्ली प्रशासनाने बंगालच्या लोकांशी निष्पक्ष आणि समान वागणूक द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. बंगालमधून आलेल्या लोकांच्या हक्कांच्या आणि सुरक्षेच्या दृष्टीने ममतांचा हा दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. मुख्यमंत्र्यांनी सुरक्षेच्या मुद्द्यावरूनही प्रश्न उपस्थित केले.
"जर दिल्लीत एखादा स्फोट झाला, तर दिल्ली पोलीस कुठे असतात? जेव्हा मी स्वतः येथे येते, तेव्हा दिल्ली प्रशासन घाबरतं. जर मला हवं असतं, तर मी लाखो लोकांना येथे आणू शकले असते, पण मी केवळ अशा ५० लोकांना सोबत आणलं आहे ज्यांना 'एसआयआर' (SIR) मध्ये मृत दाखवण्यात आलं होतं. दिल्लीत अजूनही सरंजामशाही पद्धत सुरू असून नागरिकांच्या सुरक्षेची खात्री दिली जात नाही" असं ममतांनी म्हटलं आहे.
तृणमूल काँग्रेसने (TMC) आपल्या अधिकृत पोस्टमध्ये म्हटलं आहे की, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील हे शिष्टमंडळ मुख्य निवडणूक आयुक्तांची भेट घेऊन आपल्या मागण्या मांडणार आहे. वारंवार निवेदन देऊनही दुर्लक्ष केले गेल्याने, आता निवडणूक आयोगाकडून तातडीने सुधारात्मक कारवाईची मागणी केली जाईल. पीडित कुटुंबांचे अधिकार आणि सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी ममता बॅनर्जींचा हा दौरा महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
Web Summary : Mamata Banerjee criticizes the central government and Delhi police, alleging deliberate defamation of Bengal and biased treatment of its people visiting Delhi. She demands fair treatment and raises security concerns, emphasizing democracy and equal rights.
Web Summary : ममता बनर्जी ने केंद्र सरकार और दिल्ली पुलिस पर बंगाल को बदनाम करने का आरोप लगाया। उन्होंने दिल्ली आने वाले बंगाल के लोगों के साथ पक्षपातपूर्ण व्यवहार की आलोचना की और निष्पक्ष व्यवहार की मांग की, सुरक्षा पर सवाल उठाए।