पती-पत्नी असल्याचं सांगून हॉटेलमध्ये राहिले; २०व्या साक्षीदारामुळे 'निळा ड्रम' हत्याकांडातील मुस्कान-साहिलच्या अडचणी वाढल्या!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2026 13:38 IST2026-04-02T13:36:13+5:302026-04-02T13:38:03+5:30
मेरठमधील 'निळा ड्रम' सौरभ हत्याकांड प्रकरणात हॉटेल मॅनेजरने महत्त्वाची साक्ष दिली आहे.

पती-पत्नी असल्याचं सांगून हॉटेलमध्ये राहिले; २०व्या साक्षीदारामुळे 'निळा ड्रम' हत्याकांडातील मुस्कान-साहिलच्या अडचणी वाढल्या!
मेरठमधील संपूर्ण राज्याला हादरवून सोडणाऱ्या सौरभ हत्याकांड प्रकरणाची सुनावणी आता अंतिम टप्प्यात आली आहे. बुधवारी जिल्हा न्यायाधीशांच्या न्यायालयात २० व्या साक्षीदाराची साक्ष नोंदवण्यात आली, ज्यामध्ये धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. हिमाचल प्रदेशातील कसोल येथील 'पूर्णिमा गेस्ट हाऊस'च्या मॅनेजरने कोर्टात हजेरी लावत आरोपी मुस्कान आणि साहिल यांचा खोटारडेपणा उघड केला आहे.
पती-पत्नी सांगून हॉटेलमध्ये मुक्काम
गेस्ट हाऊसचे मॅनेजर अमन कुमार यांनी कोर्टात दिलेल्या साक्षीनुसार, हत्या केल्यानंतर फरार झालेले मुस्कान आणि साहिल हिमाचलमध्ये लपले होते. तिथे त्यांनी स्वतःची ओळख लपवून आणि परस्परांना पती-पत्नी असल्याचे भासवून हॉटेलमध्ये रूम बुक केली होती. मॅनेजरने कोर्टात हॉटेलचे रजिस्टर, एन्ट्री रेकॉर्ड आणि दोन्ही आरोपींची ओळखपत्रे सादर केली आहेत. मार्च २०२५ मधील ही एन्ट्री आता या केसमध्ये पीडित पक्षासाठी सर्वात मोठा पुरावा ठरत आहे, कारण यामुळे हत्येनंतर दोन्ही आरोपी एकत्र होते आणि फरार झाले होते, यावर शिक्कामोर्तब झाले आहे.
७ एप्रिलला होणार टर्निंग पॉईंट साक्ष
या प्रकरणातील २१ वा साक्षीदार संजीव पाल याची साक्ष ७ एप्रिल रोजी होणार आहे. संजीव हा मृत सौरभचा जवळचा मित्र आहे. हत्येच्या दिवशी म्हणजेच ८ मार्च २०२५ रोजी जेव्हा संजीवने सौरभला फोन केला होता, तेव्हा मुस्कानने तो फोन उचलला होता. "आम्ही दोघे फिरायला आलो आहोत, वारंवार फोन करून त्रास देऊ नकोस," असे म्हणत तिने संजीवला धमकावले होते. ही साक्ष या खटल्याला कलाटणी देणारी ठरू शकते.
१५ एप्रिलला निकालाची शक्यता?
आतापर्यंत या प्रकरणात एकूण २० साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. यामध्ये सौरभचे कुटुंबीय, डॉक्टर, फॉरेन्सिक टीम, कॅब ड्रायव्हर आणि हॉटेल मॅनेजर यांचा समावेश आहे. पोलिसांच्या आरोपपत्रात एकूण ३५ साक्षीदार असले तरी, महत्त्वाच्या साक्षीदारांची नोंदणी पूर्ण होत आली आहे. कायदेशीर तज्ज्ञांच्या मते, ७ एप्रिलच्या साक्षीनंतर अंतिम युक्तिवाद होईल आणि न्यायालय १५ एप्रिलपर्यंत या प्रकरणाचा निकाल जाहीर करू शकते. गेल्या वर्षी मार्चमध्ये घडलेल्या या क्रूर हत्याकांडाला आता एक वर्ष पूर्ण झाले असून, सौरभच्या कुटुंबाला आता केवळ न्यायाची प्रतीक्षा आहे.