नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यांच्या मुख्यमंत्र्यांमध्ये महत्त्वाची व्हर्चुअल बैठक झाली. मध्य पूर्वेत सुरू असलेले युद्ध आणि स्ट्रेट होर्मुझ बंद झाल्याने जागतिक ऊर्जा संकट निर्माण झालं आहे. हा धोका लक्षात घेता पंतप्रधानांनी सर्व मुख्यमंत्र्यांची बैठक घेतली, जवळपास २ तास ही बैठक झाली. जगात कितीही गोंधळ उडाला तरी भारताला होणारा तेल, गॅस आणि जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा थांबता कामा नये हे या बैठकीत ठरवण्यात आले.
पंतप्रधान मोदींनी काही दिवसांपूर्वी देशाला आवाहन करत मध्य पूर्वेतील संघर्षामुळे भारतासमोर अनेक आव्हाने उभी राहू शकतात. केंद्र सरकार प्रत्येक संकटावर मात करण्यासाठी पाऊल उचलत आहे परंतु ग्राऊंडपातळीवर योजना राबवण्यासाठी खरी जबाबदारी राज्यांवर असल्याचे सांगितले होते. त्यातूनच सर्व मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून आपापल्या राज्यात अशी व्यवस्था निर्माण करा, ज्यातून सामान्य माणसांना जीवनावश्यक वस्तूंची कमतरता भासणार नाही असं पंतप्रधानांनी सांगितले. जेव्हा देशावर संकट येते तेव्हा केंद्र आणि राज्यांनी एकत्रित येऊन कुटुंबासारखे लढले पाहिजे असंही त्यांनी म्हटलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या परिस्थितीशी तुलना कोविड काळातील स्थितीशी केली. ज्याप्रकारे कोविड काळात केंद्र आणि राज्यांनी टीम इंडिया बनून काम केले. आज त्याच धर्तीवर काम करण्याची गरज आहे. मार्च २०२० मध्ये जेव्हा जग थांबले होते, तेव्हाही पंतप्रधानांनी मुख्यमंत्र्यांसोबत सातत्याने बैठका घेतल्या होत्या. त्यावेळी पहिली बैठक २० मार्च २०२० मध्ये बोलवली होती. त्यानंतर ४ दिवसांनी देशात ३ दिवसांसाठी लॉकडाऊन लावला होता. आज मध्य पूर्वेतील युद्धामुळे तेलाच्या किंमती वाढल्या आहेत. पुरवठा साखळी खंडित झाली आहे. त्यात भारताने एकजूट होऊन या संकटाचा सामना करावा यादृष्टीने पंतप्रधानांनी मुख्यमंत्र्यांना सूचना दिल्यात.
इंधन आणि महागाईवर चर्चा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील या बैठकीत पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, पुदुचेरी आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री उपस्थित राहू शकले नाहीत. निवडणुकांमुळे या पाच राज्यांमध्ये आदर्श आचारसंहिता लागू आहे. इतर राज्यांचे मुख्यमंत्री या बैठकीत सहभागी झाले होते. त्यात इंधन पुरवठा, वाढती महागाई आणि इतर व्यवस्था करणे त्यावर गंभीर चर्चा झाली. मुख्यमंत्र्यांनी आपापल्या राज्यातील स्थिती आणि तयारीची माहिती पंतप्रधानांना दिली. या उच्चस्तरीय बैठकीत गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि इतर बड्या राज्यांचे मुख्यमंत्री सहभागी होते. २ तास ही बैठक सुरू होती. या बैठकीत मध्य पूर्वेतील संकटाच्या पार्श्वभूमीवर देशाची सुरक्षा आणि लॉजिस्टिक्स पुरवठ्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली तसेच देशात लॉकडाऊन होणार नाही हे देखील सरकारने स्पष्ट केले आहे.
Web Summary : PM Modi met with CMs regarding the global energy crisis sparked by Middle East tensions. He emphasized teamwork, like during COVID, to ensure essential supplies and avoid shortages. Lockdown is not on the cards.
Web Summary : पीएम मोदी ने मध्य पूर्व तनाव से उत्पन्न वैश्विक ऊर्जा संकट पर सीएम के साथ बैठक की। उन्होंने आवश्यक आपूर्ति सुनिश्चित करने और कमी से बचने के लिए, कोविड के दौरान की तरह, टीम वर्क पर जोर दिया। लॉकडाउन नहीं लगेगा।