उत्तराखंडच्या टिहरी जिल्ह्यातील युमना नदीतकार कोसळल्याची भीषण अपघाताची घटना घडली. या दुर्घटनेत एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला असून एकूण ६ जण ठार झाले आहेत. बुधवारी रात्री उशिरा दिल्ली-युमनोत्री राज्य महामार्गावर ही दुर्घटना घडली. अलगार पुलावरुन ही कार जात असताना कारचालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि कार थेट नदीत कोसळली. कारमधील प्रवाशांच्या मोबाईल लोकेशनला ट्रेस करुन सायंकाळी ४ वाजता कार नदीतून बाहेर काढण्यात बचाव पथकाच्या टीमला यश आलं. मात्र, दुर्दैवाने कारमधील सहाही जण मृत्युमुखी पडले होते.
याप्रकरणी, नैनबागचे उपजिल्हाधिकारी मंजू राजपूत यांनी माहिती देताना सांगितले की, उत्तरकाशी जिल्ह्याच्या मोरी येथून ह्या कारमधून युवकाला उपचारासाठी डेदरादूनला नेण्यात येत होते. त्यावेळी, अलगार पुलावर कार आली असता २५० मीटर खोल नदीत कोसळली. रात्री उशिरा ही घटना घडल्याने अपघाताचे नेमके कारण अस्पष्ट आहे, मात्र चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटून कार नदीत कोसळल्याची प्राथमिक माहिती आहे.
कारमधील प्रवाशांसोबत सकाळपासून संपर्क होत नसल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी कैंपटी पोलीस ठाण्यास ११ वाजता यासंदर्भाने माहिती दिली. त्यानंतर, पोलिसांनी कारमधील प्रवाशांच्या लोकशेनला ट्रेस करुन कारचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू केले. त्यानुसार, सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास पाण्यातून ही कार बाहेर काढण्यात आली. त्यामध्ये, कारची मोठी दुर्दशा झाल्याचंही दिसून आलं. या दुर्घटनेत प्रताप (३०), राजपाल (२८), राजपालची पत्नी जसीला (२५), वीरेंद्र (२८) आणि चालक विनोद (३५) यांचा मृत्यू झाला आहे. हे सर्वजण मौताद मोरी गावातील रहिवाशी होते. तर, देवत्री गावच्या मुन्ना (३८) यांचाही या अपघाता मृत्यू झाला आहे.