एकाच प्रियकरासोबत होते नववधू आणि तिच्या आईचे संबंध, अनैतिक संबंधांच्या गुंत्यात गेला पतीचा बळी
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2025 15:07 IST2025-06-23T15:07:14+5:302025-06-23T15:07:36+5:30
Telangana Crime News: तेलंगाणामधील कुरनूल येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नात्यांमधील फसवणुकीमधून घडलेल्या या गंभीर गुन्ह्यामध्ये एका नवविवाहित महिलेला तिच्या पतीच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आले आहे.

एकाच प्रियकरासोबत होते नववधू आणि तिच्या आईचे संबंध, अनैतिक संबंधांच्या गुंत्यात गेला पतीचा बळी
तेलंगाणामधील कुरनूल येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नात्यांमधील फसवणुकीमधून घडलेल्या या गंभीर गुन्ह्यामध्ये एका नवविवाहित महिलेला तिच्या पतीच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आले आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपींमध्ये मृत व्यक्तीची पत्नी ऐश्वर्या आणि तिची आई सुजाता यांचा समावेश आहे. या दोघींचेही एका बँक कर्मचाऱ्यासोबत अनैतिक संबंध होते. मात्र ही घटना घडल्यापासून तो फरार आहे.
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार मृत तेजेश्वर याच्या कुटुंबीयांनी १३ फेब्रुवारी रोजी कुरनूल येथील ऐश्वर्या नावाच्या तरुणीसोबत त्याचं लग्न ठरवलं होतं. मात्र या लग्नापूर्वी पाच दिवस आधी ही नववधू ऐश्वर्या फरार झाली होती. ती कुरनूलमधील एका बँक कर्मचाऱ्यासोबत पळून गेल्याची कुजबूज सुरू होती. मात्र ती १६ फेब्रुवारी रोजी परत आली. तसेच आईवर हुंड्याची व्यवस्था करण्यासाठी दबाव असल्याने आपण एका मित्राच्या घरी गेले होते, असे तिने सांगितले.
तिने भावूक होत तेजेश्वर याच्याकडे आपल्या प्रेमाची साक्ष दिली. तसेच १८ मे रोजी या दोघांचंही लग्न झालं. मात्र लग्नानंतर या दोघांच्याही संसारात अडचणी येऊ लागल्या. ऐश्वर्या ही तासनतास कुणाशी तरी बोलत असल्याचं तेजेश्वरच्या निदर्शनास आलं. अखेर १७ जून रोजी तेजेश्वर अचानक बेपत्ता झाल्याने या प्रकरणाला वेगळीच कलाटणी मिळाली. त्याच्या भावाने तेजेश्वर बेपत्ता असल्याची तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी केलेल्या तपासामध्ये धक्कादायत माहिती समोर आली.
या प्रकरणी तेजेश्वरची पत्नी ऐश्वर्या आणि तिच्या आईची पोलिसांनी कसून चौकशी केल्यावर त्यांनी आपले एका बँक कर्मचाऱ्याशी अनैतिक संबंध असल्याचे कबूल केले. सुजाता हिचे त्या बँक कर्मचाऱ्याशी दीर्घकाळापासून संबंध होते. तर नंतर ऐश्वर्याही त्याच्याशी संबंध ठेवू लागली. त्यांचा कॉल डेटा तपासला असता ऐश्वर्या हिने लग्नानंतर तब्बल २ हजार वेळा या बँक कर्मचाऱ्याशी संवाद साधल्याचे उघड झाले.
दरम्यान, या हत्येमागे तेजेश्वरची संपत्ती आणि ऐश्वर्यासोबत संबंध कायम ठेवण्यास असलेला विरोध ही कारणं असू शकतात, असा पोलिसांचा अंदाज आहे. यासाठी सदर बँक कर्मचाऱ्याने सुपारी दिलली होती. तसेच त्यासाठी आपल्या ड्रायव्हरलाही त्यांच्यासोबत पाठवले होते, अशी शक्यता वर्तवली जात आहे.