काश्मीरमध्ये तणाव! खामेनेई यांच्या मृत्यूनंतर तिसऱ्या दिवशीही जनक्षोभ
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2026 05:40 IST2026-03-05T05:39:57+5:302026-03-05T05:40:27+5:30
शाळा-महाविद्यालये शनिवारपर्यंत बंद

काश्मीरमध्ये तणाव! खामेनेई यांच्या मृत्यूनंतर तिसऱ्या दिवशीही जनक्षोभ
श्रीनगर : इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनेई यांच्या निधनानंतर काश्मीर खोऱ्यात उसळलेल्या तीव्र निदर्शनांमुळे बुधवारी सलग तिसऱ्या दिवशी कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. खबरदारी म्हणून प्रशासनाने खोऱ्यातील सर्व शैक्षणिक संस्था शनिवारपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले असून, इंटरनेटचा वेगही मर्यादित करण्यात आला आहे. परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी पोलिस आणि लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची तातडीची बैठक घेतली. त्यांनी नागरिकांना शांतता राखण्याचे विनंती केली आहे.
खासदार आगांवर गुन्हा
या आंदोलनादरम्यान दिशाभूल
करणारी माहिती पसरवल्याच्या आरोपाखाली श्रीनगरचे खासदार आगा सय्यद रुहुल्ला मेहदी आणि माजी महापौर जुनैद अझीम मट्टू यांच्यावर ‘सायबर पोलिस ठाण्या’मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खोऱ्यात कडेकोट बंदोबस्त
श्रीनगरसह काश्मीरच्या अनेक भागांत, विशेषतः शियाबहुल क्षेत्रांत लोकांच्या हालचालींवर आणि एकत्र येण्यावर बंदी घालण्यात आली आहे.
शहरातील मुख्य केंद्र असलेल्या ‘लाल चौक’ येथील ऐतिहासिक ‘घंटाघर’ परिसराला रविवारी रात्रीपासूनच छावणीचे स्वरूप आले असून, हा परिसर पूर्णपणे सील करण्यात आला आहे. २०१९ नंतर काश्मीरात मोठ्या प्रमाणावर निदर्शने होण्याची ही पहिलीच वेळ आहे.
महबूबा मुफ्तींचा केंद्र सरकारवर बोचरा वार
इराणवरील या हल्ल्याबाबत भारताचे मौन अनाकलनीय असून, कठीण काळात भारताच्या पाठीशी उभे राहिलेल्या इराणबद्दल कृतज्ञता दाखवण्यात सरकार अपयशी ठरले आहे, अशा शब्दांत पीडीपी अध्यक्षा महबूबा मुफ्ती यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. दरम्यान, मुफ्ती यांनी ट्रम्प आणि नेतन्याहू यांच्या पुतळ्याचे दहन करून निषेद नोंदवला.