देशात वेद, उपनिषद, वास्तुकलेचे अभ्यासक्रम सुरू करण्याचा विचार : रमेश पोखरियाल निशंक
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2020 13:53 IST2020-01-29T13:31:18+5:302020-01-29T13:53:26+5:30
भारतात तक्षशीला, नालंदासारखी विद्यापीठे फार पूर्वीपासून असून, जगात देशाची ‘शैक्षणिक हब’ म्हणून ओळख आहे.

देशात वेद, उपनिषद, वास्तुकलेचे अभ्यासक्रम सुरू करण्याचा विचार : रमेश पोखरियाल निशंक
पुणे : भारतात तक्षशीला, नालंदासारखी विद्यापीठे फार पूर्वीपासून असून, जगात देशाची ‘शैक्षणिक हब’ म्हणून ओळख आहे. देशात परदेशी विद्यार्थ्यांची संख्या वाढविण्यासाठी आपले वेद, उपनिषद, संस्कृती, आयुर्वेद, योग, भाषा, वास्तुकला यांच्याशी संबंधित अभ्यासक्रम सुरू करण्याचा विचार करावा लागेल, असे मत केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी मंगळवारी व्यक्त केले.
भारतीय संस्कृती संबंध परिषद (आयसीसीआर), सावित्रीबाई फुले पुणेविद्यापीठ, सिम्बायोसिस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी यांच्या वतीने आयोजित डेस्टिनेशन इंडिया या दोन दिवसीय परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी निशंक बोलत होते. यावेळी आयसीसीआरचे अध्यक्ष डॉ. विनय सहस्रबुद्धे, अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेचे (एआयसीटीई) अध्यक्ष डॉ. अनिल सहस्रबुद्धे, विद्यापीठ अनुदान आयोगाचे सचिव रजनीश जैन, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, आयसीसीआरचे महासंचालक अखिलेश मिश्रा, सिम्बायोसिसचे संस्थापक अध्यक्ष डॉ. शां. ब. मुजुमदार, उपकुलपती डॉ. विद्या येरवडेकर, कुलगुरू डॉ. रजनी गुप्ते आदी उपस्थित होते.
डॉ. शां. ब. मुजुमदार म्हणाले, की सध्या विद्यापीठांंमध्ये केवळ १५ टक्के परदेशी विद्यार्थ्यांना शिकण्याची संधी दिली जाते. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर परदेशी विद्यार्थी शिक्षणापासून दूर राहतात. त्यामुळे ही अट काढून टाकावी. तसेच, परदेशी विद्यार्थी अधिक संख्येने असणाºया शहरांसाठी केंद्र सरकारने उपाययोजना आखाव्यात. डॉ. विद्या येरवडेकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.
..........
आपल्या देशाला ज्ञानाचे भांडार समजले जाते. त्यामुळे देशातील चांगली महाविद्यालये -विद्यापीठे ओळखून त्याची प्रसिद्धी करणे, नवे आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रम सुरू करणे, यूजीसी व नॅक संस्थांच्या माध्यमातून नवी मूल्यमापन पद्धती आखणे आदी उपाययोजना तातडीने कराव्या लागतील. तसेच, परदेशी विद्यार्थ्यांची संख्या वाढविण्यासाठी सर्वांना एकत्रितपणे प्रयत्न करावे लागतील.- डॉ. विनय सहस्रबुद्धे
...............
परदेशी विद्यार्थ्यांसाठी एक टास्क फोर्स तयार करणार
जगाच्या कानाकोपºयातून भारतात शिक्षण घेण्यासाठी येणाºया परदेशी विद्यार्थ्यांना व्हिसा, पासपोर्ट किंवा अन्य कागदपत्रे गोळा करताना विविध अडचणींना सामोरे जावे लागते. त्यासाठी एक टास्क फोर्स तयार करण्यात येणार आहे. यामध्ये आयसीसीआर, एआयसीटीई, यूजीसी या संस्थांच्या प्रतिनिधींसह विदेश मंत्रालय आणि मनुष्यबळ विकास मंत्रालयातील अधिकारी असतील. हे अधिकारी संबंधित विद्यार्थ्यांच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न करणार आहेत
.............
देशात परदेशी विद्यार्थ्यांची संख्या केवळ ४७ हजार असून, भारतासारख्या मोठ्या देशात ही संख्या फारच कमी आहे. ही संख्या वाढविण्यासाठी पाश्चत्य देशांच्या संस्कृतीचे अनुकरण करण्याची आवश्यकता नाही.- अखिलेश मिश्रा.
..............
नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी लवकरच
देशात तब्बल ३३ वर्षांनंतर शैक्षणिक धोरण बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार नवीन शैक्षणिक धोरणाचा मसुदा तयार करण्याचे काम सुरू असून, अंतिम मसुदा तयार केला जात आहे. लवकरच नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी केली जाईल, असे निशंक यांनी यावेळी स्पष्ट केले.