Jabalpur Boat Tragedy:मध्य प्रदेशातील जबलपूर येथील बर्गी डॅमच्या बॅकवॉटरमध्ये गुरुवारी संध्याकाळी एक मोठी दुर्घटना घडली. राज्य पर्यटन विभागाची पर्यटकांनी भरलेली क्रूझ नर्मदा नदीत उलटल्याने ९ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेतून बचावलेल्या प्रवाशांनी प्रशासनाचा ढिसाळपणा आणि क्रूझ कर्मचाऱ्यांच्या असंवेदनशीलतेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.
गुरुवारी संध्याकाळी ३० पर्यटकांना घेऊन ही क्रूझ बर्गी डॅममध्ये फेरफटका मारत होती. अचानक आलेल्या वादळी वाऱ्यांमुळे पाण्याचा प्रवाह वाढला आणि क्रूझचे संतुलन बिघडून ती पाण्यात उलटली. हवामान खात्याने आधीच यलो अलर्ट जारी केला असतानाही पर्यटकांना घेऊन क्रूझ पाण्यात का उतरवण्यात आली? असा संतप्त सवाल आता विचारला जात आहे.
"आम्ही ओरडत होतो, पण क्रूझ चालकाने ऐकले नाही"
या अपघातातून वाचलेले दिल्लीचे रहिवासी प्रदीप कुमार यांनी घडलेला थरार मांडला. या दुर्घटनेत दुर्दैवाने प्रदीप यांनी आपली पत्नी आणि ४ वर्षांच्या चिमुकल्या मुलाला गमावले. प्रदीप यांच्या मते, क्रूझवर ३० प्रवासी होते पण सर्वांसाठी लाईफ जॅकेट उपलब्ध नव्हते. प्रवाशांनी एकमेकांमध्ये जॅकेट वाटून घेतली. बोटीवर केवळ दोन कर्मचारी होते. हवामान बिघडत असल्याचे पाहून प्रवाशांनी आणि किनाऱ्यावरील लोकांनी बोट किनाऱ्याला घेण्याची विनंती केली, पण चालकाने त्याकडे दुर्लक्ष करत बोट पुढेच नेली.
२ मिनिटांत होत्याचं नव्हतं झालं
"अचानक वारे सुटले आणि पाणी खवळले. मी जॅकेट घातलं आणि पुढच्या २-३ मिनिटांतच होत्याचं नव्हतं झालं," अशा शब्दात प्रदीप यांनी आपला आक्रोश व्यक्त केला.
प्रशासकीय चूक की निष्काळजीपणा?
हवामान खात्याने सोसाट्याच्या वाऱ्याचा इशारा दिला असतानाही पर्यटन विभागाने क्रूझ चालवण्याची परवानगी कशी दिली? असा सवाल विचारला जात आहे. आपत्कालीन स्थितीत प्रवाशांना मदत करण्यासाठी क्रूझवर पुरेसे कर्मचारी आणि सुरक्षा साधने नव्हती असाही आरोप करण्यात आला. किनाऱ्यावरील लोकांनी इशारा देऊनही बोट सुरक्षित ठिकाणी नेण्यात चालकाला जमले नाही.
बचावकार्य आणि मदत
घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी दोरखंडाच्या साहाय्याने काहींना वाचवले. त्यानंतर एसडीआरएफ आणि स्थानिक बचाव पथकाने रात्रभर शोधमोहीम राबवली. आतापर्यंत १५ जणांना सुखरूप बाहेर काढून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. राज्यमंत्री राकेश सिंह यांनी घटनास्थळाची पाहणी केली असून ही घटना अत्यंत दुर्दैवी असल्याचे म्हटले आहे. मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी ४ लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.
Web Summary : A cruise accident in Jabalpur claimed nine lives after a boat capsized in the Narmada River. Survivors allege the boat driver ignored warnings about the weather, and life jackets were insufficient. A survivor lost his wife and child in the tragedy. The government has announced compensation.
Web Summary : जबलपुर में नर्मदा नदी में एक नाव के पलटने से नौ लोगों की जान चली गई। बचे हुए लोगों का आरोप है कि नाव चालक ने मौसम के बारे में चेतावनियों को अनसुना कर दिया, और लाइफ जैकेट अपर्याप्त थे। एक बचे हुए व्यक्ति ने त्रासदी में अपनी पत्नी और बच्चे को खो दिया। सरकार ने मुआवजे की घोषणा की है।