जुम्मा ब्रेकवरून NDA मध्ये फूट! आसाम सरकारच्या निर्णयावर या महत्वाच्या मित्र पक्षानं उपस्थित केला सवाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2024 14:08 IST2024-08-31T14:07:36+5:302024-08-31T14:08:42+5:30
नीरज कुमार यांनी यानिर्णयाचा निषेध करताना म्हटले आहे की, धार्मिक आस्थेवर हल्ला करण्याचा अधिकार कुणालाही नाही...

जुम्मा ब्रेकवरून NDA मध्ये फूट! आसाम सरकारच्या निर्णयावर या महत्वाच्या मित्र पक्षानं उपस्थित केला सवाल
आसाम सरकारने विधानसभेतील जुम्मा ब्रेकसंदर्भात घेतलेल्या निर्णयावरून आता एनडीएमध्ये फूट पडताना दिसत आहे. जेडीयू नेते नीरज कुमार यांनी शनिवारी आसाम सरकारच्या या निर्णयाचा विरोध केला आहे.
नीरज कुमार यांनी यानिर्णयाचा निषेध करताना म्हटले आहे की, धार्मिक आस्थेवर हल्ला करण्याचा अधिकार कुणालाही नाही. तसेच, जर आसामच्या मुख्यमंत्र्यांनी लोकांना गरीबीतून बाहेर काढण्यासाठी अधिक लक्ष दिले असते तर बरे झाले असते, असेही नीरज यांनी म्हटले आहे. ते एएनआय सोबत बोलत होते.
कामाख्या मंदिरातील बळी वरही उपस्थित केला सवाल-
जेडीयू नेते नीरज कुमार पुढे म्हणाले, आसामच्या मुख्यमंत्र्यांनी घेतलेला निर्णय संविधानाच्या मूलभूत सिद्धांताच्या विरोधात आहे. प्रत्येकाला आपली धार्मिक आस्था जपण्याचा अधिकार आहे. मला मुख्यमंत्री सरमा यांना विचारायचे आहे की, आपण रमझानदरम्यान शुक्रवारच्या सुट्टीवर बंदी घालत आहात आणि त्यामुळे कामाची कार्यक्षमता वाढेल असा दावा करत आहात. माँ कामाख्या मंदिर हा हिंदू परंपरेचा एक महत्त्वाचा भाग आहे, आपण तेथील बळी प्रथेवर बंदी घालू शकता?
असम सरकारनं जुम्मा ब्रेक रद्द केला -
आसाम विधानसभेत कर्मचाऱ्यांना जुम्मा अर्थात शुक्रवारी मिळणारा दोन तासांचा ब्रेक आता रद्द करण्यात आला आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोट्स करताना सरमा यांनी म्हटले होते, "आसाम विधानसभेने दोन तासांचा जुम्मा ब्रेक रद्द केला आहे. यामुळे काम आणि उत्पादकतेवर परिणाम होत होता. याच बरोबर आम्ही वसाहतवादी काळातील आणखी एक परंपरा संपवली आहे. मुस्लीम लीगचे सैयद सादुल्ला यांनी 1937 मध्ये ही प्रथा सुरू केली होती. मी विधानसभा अध्यक्ष आणि आपल्या आमदारांचे या ऐतिहासिक निर्णयासाठी आभार मानतो." एवढेच नाही तर, या निर्णयाच्या माध्यमाने आम्ही विधानसभेच्या उत्पादकतेला प्राधान्य दिले आहे, असेही मुख्यमंत्री हिमंता यांनी म्हटले आहे.