सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2025 14:25 IST2025-06-18T14:24:11+5:302025-06-18T14:25:08+5:30

Raja Raghuvanshi Murder Case: राजा रघुवंशी हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या सोनम रघुवंशी हिच्या मोबाईलमधील कॉल डिटेलमधून ती हे हत्याकांड घडण्यापूर्वी काही महिने आधी संजय वर्मा नावाच्या एका तरुणाच्या सातत्याने संपर्कात होती, अशी माहिती उघड झाली आहे.

Sonam called 112 times in 25 days, who is Sanjay Verma? New twist in Raja Raghuvanshi murder case | सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  

सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  

सध्या देशभरात चर्चेचा विषय ठरलेल्या इंदूर येथील राजा रघुवंशी हत्या प्रकरणाच्या तपासामधून दररोज नवनवी माहिती समोर येत आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या सोनम रघुवंशी हिच्या मोबाईलमधील कॉल डिटेलमधून ती हे हत्याकांड घडण्यापूर्वी काही महिने आधी संजय वर्मा नावाच्या एका तरुणाच्या सातत्याने संपर्कात होती, अशी माहिती उघड झाली आहे. सोनम रघुवंशी हिने संजय वर्मा नावाच्या तरुणाला १ मार्च ते २५ मार्च या २५ दिवसांच्या कालावधीमध्ये तब्बल ११२ वेळा फोन केला होता. त्यामुळे आता राजा सूर्यवंशी याच्या हत्येच्या प्रकरणात केवळ राज कुशवाहा नाही तर इतर काही लोकही सहभागी असण्याची शक्यता बळावली आहे. आता हा संजय वर्मा नेमका कोण याचा तपासा पोलीस करत आहेत.

राजा रघुवंशी हत्या प्रकरणामध्ये त्याची पत्नी सोनम रघुवंशी हिच्या सुरू असलेल्या चौकशीदरम्यान संजय वर्मा याचं नाव समोर आलं आहे. तसेच या दोघांचंही मार्च महिन्यात वारंवार बोलणं झाल्याचीही माहिती मिळाली आहे. त्यामुळे आता या प्रकरणाचा तपास करत असलेल्या मेघालय पोलिसांकडून संजय वर्मा हा सोनम रघुवंशी हिला मदत करणारा मुख्य मदतगार होता का? सोनमला वाराणसी आणि पुढे गाझीपूरपर्यंत कुणी पोहोचवलं? सोनमसोबत वाराणसीपर्यंत आलेले दोन तरुण कोण होते? ते आता कुठे आहेत? या प्रश्नांच्या उत्तरांचा शोध घेतला जात आहे.

दरम्यान, राजा रघुवंशी हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेली सोनम रघुवंशी ही काही दिवस बेपत्ता होती. त्यानंतर ती अचानक उत्तर प्रदेशमधील गाझीपूर येथे सापडली होती. तसेच सोनमने दिलेल्या माहितीनुसार तिने वाराणसीहून गाझीपूरपर्यंतच्या केलेल्या प्रवासात तिच्यासोबत दोघेजण होते. याबाबत गाझीपूरमधील सैदपूर येथील रहिवासी उजाला यादव यांनी केलेल्या दाव्यानुसार त्या गाझीपूरला जाणारी बस पकडण्यासाठी वाराणसी स्टेशनवर आल्या असताना सोनम तिथे आली होती. तसेच तिने गोखरपूरला जाणाऱ्या गाडीबाबत माहिती विचारली होती. तेव्हा तिच्यासोबत दोन तरुणही होते, असे उजाला यादव यांनी सांगितले होते.

इंदूर येथील रहिवासी असलेल्या राजा सूर्यवंशी याचा विवाह सोनम रघुवंशी हिच्यासोबत ११ मे रोजी झाला होता. त्यानंतर हे दाम्पत्य हनिमूनासाठी मेघालयमध्ये गेले होते. तिथून हे दोघेही रहस्यमयरीत्या बेपत्ता झाले होते. त्यानंतर पोलिसांनी कसून तपास केल्यावर राजा सूर्यवंशी याचा मृतदेह एका दरीत सापडला होता. तर बेपत्ता असलेल्या सोनम हिला पोलिसांनी काही दिवसांनंतर अटक केली होती.  

Web Title: Sonam called 112 times in 25 days, who is Sanjay Verma? New twist in Raja Raghuvanshi murder case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.