आखातातील भारतीयांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी केले संसदेत निवेदन
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2026 06:14 IST2026-03-10T06:14:14+5:302026-03-10T06:14:59+5:30
मध्य पूर्वेतील स्थितीबाबत सभागृहात चर्चा झाली पाहिजे, अशी मागणी करत विरोधकांनी केलेल्या गदारोळानंतर लोकसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.

आखातातील भारतीयांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी केले संसदेत निवेदन
नवी दिल्ली : मध्य पूर्वेतील तणाव कमी होण्याची आवश्यकता असून, त्या भागातील सर्व प्रश्न सोडविण्यासाठी चर्चा, तसेच राजनैतिक मार्गांचा अवलंब करावा, असे आवाहन भारताने सोमवारी केले, तसेच या प्रदेशात राहणाऱ्या सुमारे एक कोटी भारतीयांची सुरक्षा ही आमच्यासाठी सर्वोच्च प्राधान्य असल्याचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये स्पष्ट केले. मध्य पूर्वेतील स्थितीबाबत सभागृहात चर्चा झाली पाहिजे, अशी मागणी करत विरोधकांनी केलेल्या गदारोळानंतर लोकसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.
ऊर्जा सुरक्षा आणि व्यापार हित जपणेही महत्त्वाचे असल्याचे जयशंकर यांनी सांगितले. या संघर्षाबाबत संसदेत स्वतःहून निवेदन करताना जयशंकर यांनी सांगितले की, मध्य पूर्वेतील सर्व देशांच्या सार्वभौमत्व आणि भौगोलिक अखंडतेचा भारत आदर करतो. इराणच्या जहाजाला भारतीय बंदरात थांबण्याची परवानगी देण्याचा मानवतावादी दृष्टिकोनातून घेतलेला निर्णय योग्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
‘तणाव वाढवू नका, सुरक्षेला द्या महत्त्व‘
जयशंकर म्हणाले की, या संघर्षग्रस्त भागात अडकलेल्या ६७ हजार भारतीयांना परत आणले असून तेथे शांतता प्रस्थापित व्हावी, असे भारताचे मत आहे. या प्रदेशातील सर्व घटकांनी संयम बाळगावा, सुरक्षेला प्राधान्य द्यावे, ही आमची भूमिका असल्याचे सांगितले.
विरोधकांना हवी चर्चा
संसदेत विरोधकांनी मध्य पूर्वेतील परिस्थितीवर सविस्तर चर्चा व्हावी, अशी मागणी केली. राज्यसभेत विरोधकांनी सभात्याग केला, तर लोकसभेत गोंधळामुळे सभागृह दुपारी तीन वाजेपर्यंत तहकूब करावे लागले.
३ गोष्टींना भारताचे प्राधान्य
- भारतीय नागरिकांची सुरक्षा
- ऊर्जा सुरक्षा
- व्यापारविषयक हित जपणे