साधे कपडे, सहा बैठका अन्...; ISRO च्या दोन अपयशांच्या चौकशीसाठी अजित डोवाल यांची 'सीक्रेट' एन्ट्री
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2026 11:05 IST2026-02-06T10:43:01+5:302026-02-06T11:05:24+5:30
इस्रोच्या दोन मोठ्या मोहिमा अयशस्वी झाल्यानंतर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार तपास करत आहेत.

साधे कपडे, सहा बैठका अन्...; ISRO च्या दोन अपयशांच्या चौकशीसाठी अजित डोवाल यांची 'सीक्रेट' एन्ट्री
Ajit Doval vist VSSC ISRO:भारतीय अंतराळ मोहिमांचा कणा आणि जगातील सर्वात विश्वासार्ह रॉकेट मानल्या जाणाऱ्या पीएसएलव्हीच्या सलग दोन अपयशांमुळे देशाच्या सुरक्षा यंत्रणांसमोर नवं प्रश्न निर्माण झाला आहे. २०२५ आणि २०२६ मध्ये दोन लागोपाठ आलेल्या अपयशानंतर, खुद्द राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी इस्रोच्या विक्रम साराभाई स्पेस सेंटरला गुप्त भेट दिल्याची माहिती समोर आली आहे. या दौऱ्याची जोरदार चर्चा सुरु झाली असून त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
नेमकी चिंता काय?
इस्रोचे ज्या रॉकेटची यशस्वी उड्डाण घेण्याची क्षमता ९० टक्क्यांपेक्षा अधिक आहे ते पीएसएलव्ही सलग दोनदा तिसऱ्या टप्प्यात निकामी का ठरले? हा केवळ तांत्रिक बिघाड आहे की भारताच्या वाढत्या अंतराळ शक्तीला रोखण्यासाठी बाहेरून छेडछाड केली आहे का? या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सूचनेवरून अजित डोभाल थिरुवनंतपुरममध्ये पोहोचल्याची चर्चा माध्यमांमध्ये आहे.
लपून-छपून दौरा आणि ६ गोपनीय बैठका
मिळालेल्या माहितीनुसार, डोवाल यांचा हा दौरा इतका गुप्त होता की त्यांनी कोणताही प्रोटोकॉल पाळला नाही. ते इंडिगोच्या विमानाने सामान्य प्रवाशासारखे आले आणि त्यांच्यासोबत फक्त ४ साध्या वेशातील सुरक्षा रक्षक होते. २२-२३ जानेवारी २०२६ दरम्यान त्यांनी व्हीएसएससी संचालकांशी आणि वरिष्ठ शास्त्रज्ञांशी बंद दाराआड ६ वेळा प्रदीर्घ चर्चा केली. रॉकेट सिस्टीममध्ये बाहेरून काही छेडछाड होण्याची शक्यता आहे का, यावर त्यांनी डेटा अॅनालिसिसच्या माध्यमातून बारकाईने तपासणी केली.
दोन मोठी अपयशं; २५०० कोटींचे नुकसान
१. PSLV-C61 (१८ मे २०२५): हे रॉकेट EOS-09 उपग्रह घेऊन गेले होते. तिसऱ्या टप्प्यातील मोटर चेंबरमध्ये दाब कमी झाल्याने हे मिशन अयशस्वी झाले.
२. PSLV-C62 (१२ जानेवारी २०२६): या मोहिमेत सर्व्हिलन्स सॅटेलाइट EOS-N1 सह १६ उपग्रह होते. पुन्हा एकदा तिसऱ्या टप्प्यात बिघाड झाला आणि सर्व उपग्रह नष्ट झाले. या दोन अपयशांमुळे भारताचे सुमारे २५०० कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.
सरकारचा घातपाताबाबत खुलासा
या प्रकरणावर केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी संसदेत स्पष्टीकरण दिले की, दोन्ही अपयशांची कारणे वेगवेगळी होती. "मागच्या वेळी बल्ब फ्युज झाला असेल, तर या वेळी बाहेरून ट्रिपिंग झाले आहे," असे म्हणत त्यांनी हा तांत्रिक बिघाड असल्याचे सांगितले. तपासणीत अद्याप घातपाताचे कोणतेही पुरावे मिळालेले नाहीत. मात्र, तरीही सुरक्षेच्या दृष्टीने अंतर्गत चौकशी समित्या तयार करण्यात आल्या आहेत.
देशाच्या सुरक्षेचा प्रश्न
ईओएस एन १ सारखे उपग्रह हे देशाच्या सीमांच्या निगराणीसाठी अत्यंत महत्त्वाचे असतात. अशा महत्त्वाच्या उपग्रहांचे प्रक्षेपण अपयशी होणे हा केवळ आर्थिक तोटा नसून राष्ट्रीय सुरक्षेचा मोठा प्रश्न आहे. म्हणूनच एनएसए डोभाल स्वतः या तपासात उतरले आहेत. ते आपला सविस्तर अहवाल लवकरच पंतप्रधानांना सादर करतील. दुसरीकडे इस्रोने जून २०२६ पर्यंत पीएसएलव्हीचे सर्व लॉन्च थांबवले आहेत. रॉकेटची गुणवत्ता तपासणी आता अधिक कडक केली जाणार आहे.