Rohini Acharya : "मुली असुरक्षित, कोणत्या तोंडाने सुशासनाचा दावा?", रोहिणी आचार्य यांची नितीश कुमारांवर टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2026 19:28 IST2026-02-13T19:26:59+5:302026-02-13T19:28:29+5:30
Rohini Acharya Yadav And Nitish Kumar : लालू प्रसाद यादव यांची कन्या रोहिणी आचार्य यांनी बिहारमधील मुलींच्या सुरक्षिततेबाबत नितीश कुमार सरकारला धारेवर धरलं आहे.

Rohini Acharya : "मुली असुरक्षित, कोणत्या तोंडाने सुशासनाचा दावा?", रोहिणी आचार्य यांची नितीश कुमारांवर टीका
लालू प्रसाद यादव यांची कन्या रोहिणी आचार्य यांनी बिहारमधील मुलींच्या सुरक्षिततेबाबत नितीश कुमार सरकारला धारेवर धरलं आहे. "आज बिहारमध्ये माता-भगिनी आणि मुलींचं आयुष्य, सन्मान आणि सुरक्षा धोक्यात आली आहे. अशा परिस्थितीत नितीश कुमार कोणत्या तोंडाने सुशासनाचा दावा करतात?" असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. राज्यात बलात्काराच्या घटना वाढल्या असून मुलींचा संशयास्पद मृत्यू होत असल्याचंही त्यांनी नमूद केलं.
रोहिणी आचार्य पुढे म्हणाल्या की, पोलीस तपासाच्या नावाखाली प्रकरणांवर पडदा टाकण्याचं काम केलं जातं. दोषींना पकडण्याऐवजी पीडितांच्या कुटुंबीयांनाच नाहक त्रास दिला जातो. बिहारमधील सध्याची कमकुवत आणि हतबल शासन व्यवस्थाच यासाठी कारणीभूत आहे.

"जगभरात बिहारची बदनामी होतेय"
रोहिणी आचार्य यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका करताना म्हटलं की, "दुर्दैवाची गोष्ट म्हणजे आत्ममुग्धतेत मग्न असलेल्या मुख्यमंत्र्यांना आणि त्यांच्या सरकारमधील मंत्र्यांना बिहारच्या माता-भगिनींचा आक्रोश ऐकू येत नाही. ज्या घृणास्पद घटनांमुळे जगभरात बिहारची बदनामी होत आहे, त्या सरकारला दिसत नाहीत." पीडितांना न्याय मिळवून देणं तर लांबची गोष्ट, पण मुख्यमंत्री किंवा त्यांच्या सहकाऱ्यांच्या तोंडून सांत्वनाचं दोन शब्दही निघत नाहीत अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
रोहिणी आचार्य यांनी सोशल मीडियावर एका वृत्तपत्राचं कात्रण शेअर केलं आहे. यामध्ये एका बारावीत शिकणाऱ्या १६ वर्षीय विद्यार्थिनीच्या मृत्यूचा उल्लेख आहे. कोचिंग क्लासच्या चौथ्या मजल्यावरून पडून या मुलीचा मृत्यू झाला असून तिची हत्या करण्यात आल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. याच घटनेचा दाखला देत रोहिणी यांनी नितीश सरकारला जाब विचारला आहे.