हत्तीला वाचवण्यासाठी गेले, रेस्क्यु ऑप्रेशनचे वृत्तांकन करताना रिपोर्टरचा बुडुन मृत्यू, घटना कॅमेऱ्यात कैद
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2021 12:15 IST2021-09-26T18:39:14+5:302021-09-27T12:15:17+5:30
ओडिशाच्या कटक जिल्ह्यातील महानदीमध्ये अडकलेल्या हत्तीला वाचवण्याच्या थरारक घटनेचे वृत्तांकन करताना एका पत्रकाराचा मृत्यू झाला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे.

हत्तीला वाचवण्यासाठी गेले, रेस्क्यु ऑप्रेशनचे वृत्तांकन करताना रिपोर्टरचा बुडुन मृत्यू, घटना कॅमेऱ्यात कैद
ओडिशाच्या कटक जिल्ह्यातील महानदीमध्ये अडकलेल्या हत्तीला वाचवण्याच्या थरारक घटनेचे वृत्तांकन करताना एका पत्रकाराचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. मुंडळीजवळ महानदीमध्ये एक हत्ती अडकला होता. त्याला वाचवण्यासाठी ओडिशा आपत्ती शीघ्र कृती दलाकडून (ओडीआरएएफ) प्रयत्न सुरू होते. पत्रकार अरिंदम दास आणि फोटो जर्नलिस्ट प्रभातही बचाव कार्यात सामील झाले. बोट हत्तीपासून काही अंतरावर असतानाच अचानक पाण्याच्या प्रवाहात ओढली गेली. त्यानंतर ही बोट प्रवाहात गटांगळ्या खाऊ लागली.
याठिकाणी पाण्याचा जोर इतका प्रचंड होता की, शर्थीचे प्रयत्न करुनही बोट बाहेर निघत नव्हती. यावेळी बोटीतील सर्वचजण जीव वाचवण्यासाठी धडपड करत होते. नदीच्या प्रवाहाच्या सततच्या तडाख्यांमुळे अनेकजण बोटीतून बाहेर फेकले गेले. त्यानंतर ही बोटच पलटी झाली. याठिकाणी पाण्याचा जोर इतका होता की, लाईफ जॅकेट घालूनही पाण्यावर तरंगत राहणे अशक्य होते. त्यामुळे अरिंदम दास यांच्या नाकातोंडांत पाणी गेले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे.
Saddened to hear about the demise of Chief Reporter of #OTV#ArindamDas who died on duty as the boat swept away while covering 'Operation Gaja' near Munduli Barrage in Odisha.
— Srinivas BV (@srinivasiyc) September 24, 2021
My heartfelt condolences to the bereaved family. Prayers for those who are still battling for life. pic.twitter.com/wG56UA2hs1
या दुर्घटनेनंतर जखमींना कटकमधील एससीबी वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात आणण्यात आले. मात्र, रुग्णालयात आणण्यापूर्वीच अरिंदम यांचा मृत्यू झाला होता. याविषयी माहिती देताना डॉक्टरांनी सांगितले की, अरिंदम दास यांना रुग्णालयात आणले तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. फोटो जर्नलिस्ट प्रभात आणि ओडीआरएएफ सदस्य सध्या आयसीयूमध्ये उपचार घेत आहेत. याशिवाय आणखी तीन ODRAF कर्मचारी रुग्णालयातच उपचार घेत आहेत. या घटनेमुळे ओदिशात हळहळ व्यक्त केली जात आहे.
ओदिशातील प्रसारमाध्यमांच्या वर्तुळात अरिंदम दास हा परिचित चेहरा होता. एक निडर आणि चांगला व्यक्ती म्हणून त्यांची ओळख होती. अरिंदम दास यांचा मृत्यू सर्वांसाठीच धक्कादायक ठरला होता. या दुर्घटनेनंतर अरिंदम दास यांच्यावर रायकाला या त्यांच्या मूळगावी अंत्यसंस्कार करण्यात आले.