बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2025 16:53 IST2025-06-08T16:52:44+5:302025-06-08T16:53:11+5:30
Bihar Election Update: भाजपसाठी ही निवडणूक महत्वाची आहे. केंद्रात नितीशकुमारांच्या मदतीनेच सरकार सुरु आहे.

बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
बिहार विधानसभा निवडणुकीची तयारी सुरु झाली आहे. ऑक्टोबर, नोव्हेंबरला ही निवडणूक होण्याची शक्यता आहे. अशातच भाजपसाठी ही निवडणूक महत्वाची आहे. केंद्रात नितीशकुमारांच्या मदतीनेच सरकार सुरु आहे. यामुळे त्यांना नाराज केले तर केंद्रात अडचणी येऊ शकतात यामुळे एनडीएसाठी तारेवरची करसत असताना त्यांचाच एक मित्रपक्ष लोक जनशक्ती पार्टी (रामविलास) वेगळे लढण्याचे संकेत देत होता. परंतू, आज चिराग पासवान यांनी याची घोषणाच करून टाकली आहे.
पासवान यांनी मोठी घोषणा केली आहे. येत्या निवडणुकीत आपला पक्ष सर्वच्या सर्व २४३ जागा लढणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. एनडीएला मजबूत करण्याच्या उद्देशाने लढणार असल्याचे ते म्हणाले. भोजपूरमध्ये एका सभेत त्यांनी ही घोषणा केली आहे.
आपला पक्ष कोणत्याही प्रकारे एनडीएपासून वेगळा नाही, आपण बिहारमधील २४३ जागांवर निवडणूक लढवू. जेणेकरून एनडीए मजबूत होईल आणि आपण एकत्रितपणे विजयाकडे वाटचाल करू, असे ते म्हणाले. आपल्या पक्षाने नेहमीच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवला आहे, असे ते म्हणाले.
मागील निवडणुकीतही पासवान यांनी आपण मोदींचा हनुमान असल्याचे सांगत स्वतंत्र निवडणूक लढविली होती. यानंतर लोकसभेपूर्वी नितीशकुमार यांची जेडीयू आणि लोजपा यांना पुन्हा भाजपाने एकत्र आणले होते. यानंतर चिराग पासवान केंद्रात नव्या सरकारमध्ये मंत्री देखील झाले आहेत. आता स्वतंत्र निवडणूक लढणार असल्याने पासवान मंत्रिपदाचा राजीनामा देतात का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पासवान यांना निवडणुकीला सामोरे जाण्यापूर्वी राजीनामा द्यावा लागेल अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु होती.