"लोक मरत होते अन् उत्सव सुरू होता, तेव्हा अल्लू अर्जुनला अटक केली, मग इथे का नाही?" बंगळुरू चेंगराचेंगरीवरून भाजपचा हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2025 14:10 IST2025-06-05T14:08:32+5:302025-06-05T14:10:28+5:30
बंगळुरू चेंगराचेंगरीवरून भाजपचा सिद्धरामय्या, डीके शिवकुमार यांच्यावर हल्लाबोल

"लोक मरत होते अन् उत्सव सुरू होता, तेव्हा अल्लू अर्जुनला अटक केली, मग इथे का नाही?" बंगळुरू चेंगराचेंगरीवरून भाजपचा हल्लाबोल
बेंगळुरू येथील चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर RCB च्या विजयी मिरवणुकीपूर्वी झालेल्या चेंगराचेंगरीत ११ जणांचा मृत्यू झाला आहे, तर डझनावर लोक जखमी झाल आहेत. यावरू आता विरोधकांनी कर्नाटक सरकारला घेरले आहे. ही घटना म्हणजे, 'सरकारी अपयश' आणि 'राजकीय लालसे'चा परिणाम असल्याचे भाजपने म्हटले आहे. यासंदर्भात भाजपने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, "ही केवळ चेंगराचेंगरीच नव्हती, तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमधील भांडणातून निर्माण झालेली सरकारनिर्मित दुर्घटना होती."
राहुल गांधीवर थेट निशाणा -
भाजप प्रवक्ता संबित पात्रा यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावरही प्रश्न उपस्थित केला आहे. ते म्हणाले, "राहुल गांधी सातत्याने पंतप्रधान मोदी आणि भारतीय लष्कराची खिल्ली उडवत असतात. मात्र, एका दुर्घटनेत एवढ्या लोकांचा मृत्यू झाला असताना राहुल गांधी कोठे आहेत?" एवढेच नाही तर, राहुल गांधी यांनी या संदर्भात तत्काळ कारवाई करावी आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांना दिल्लीला हजर राहण्याचे आदेश द्यावेत.
"मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा" -
पात्रा म्हणाले, या संपूर्ण प्रकरणाची नैतिक जबाबदारी घेत मुख्यमंत्री आणि उप-मुख्यमंत्री यांनी तत्काळ राजीनामा द्यायला हवा. तसेच, डीके शिवकुमार यांनी जनतेची माफी मागायला हवी.
“लोक मरत होते आणि तेथे उत्सव सुरू होता” -
दुर्घटनेदरम्यान झालेल्या निष्काळजीपणासंदर्भात बोलतान भाजपने म्हटले आहे की, "जेव्हा लोक मरत होते, तेव्हा तेथे उत्सव साजरा केला जात होता. आजही 50 लोक रुग्णालयात दाखल आहेत."
"3 लाख लोक पोहोचलेच कसे?"
दुर्घटनेसंदर्भात भाष्य करताना, "तेथे 300000 लोक कसे पोहोचले? त्यांना परवानगी दिली गेली होती? जर पोलिसांनी परवानगी दिली नव्हती, तर ही विजयी मिरवणूक निघली कशी? असे प्रश्नही भाजपने उपस्थित केले आहेत.
"तेव्हा अल्लू अर्जुनला अटक करण्यात आली, तर मग इथे का नाही?" -
यावेळी भाजपने गेल्या काही दिवसांपूर्वी अभिनेता अल्लू अर्जुनसोबत घडलेल्या प्रसंगाची आठवण करून देत, अभिनेता अल्लू अर्जुनला चेंगरा चेंगरीच्या एका प्रकरणात अटक करण्यात आली होती. तर मग या प्रकरणात डीके शिवकुमार आणि सिद्धरामय्या यांच्यावर कार्रवाई का होऊ नये? असा सवालही भाजपने केला आहे.