"कोरोना लस बनवणाऱ्या वैज्ञानिकांना 'भारतरत्न' द्या", नेत्याची मागणी; मोदींना लिहिलं पत्र 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2021 16:36 IST2021-07-01T16:22:30+5:302021-07-01T16:36:44+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates : झारखंडचे आरोग्य मंत्री बन्ना गुप्ता यांनी देश कोरोनाच्या संकटाचा सामना करत असतानाच कोरोनाची लस निर्मिती करणाऱ्यांना देशातील सर्वोच्च नागरी सन्मान म्हणजेच भारतरत्न पुरस्कार देण्याची मागणी नरेंद्र मोदींकडे केली.

ranchi jharkhand health minister asks pm modi to offer bharat ratna for vaccine scientists | "कोरोना लस बनवणाऱ्या वैज्ञानिकांना 'भारतरत्न' द्या", नेत्याची मागणी; मोदींना लिहिलं पत्र 

"कोरोना लस बनवणाऱ्या वैज्ञानिकांना 'भारतरत्न' द्या", नेत्याची मागणी; मोदींना लिहिलं पत्र 

नवी दिल्ली - देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही तब्बल तीन कोटींवर पोहोचली आहे. तर लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. याच दरम्यान झारखंडचे आरोग्य मंत्री बन्ना गुप्ता यांनी देश कोरोनाच्या संकटाचा सामना करत असतानाच कोरोनाची लस निर्मिती करणाऱ्यांना देशातील सर्वोच्च नागरी सन्मान म्हणजेच भारतरत्न पुरस्कार देण्याची मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे केली आहे. गुप्ता यांनी मोदींना याबाबत पत्र लिहिलं आहे. "देशातील प्रतिभावान वैज्ञानिकांनी खूप कमी वेळामध्ये फार काम केलं असून स्वदेशी लसींच्या माध्यमातून देशातील नागरिकांचा जीव वाचवण्यासाठी मोलाचं योगदान दिलं आहे."

वैज्ञानिकांच्या कार्यासाठी 15 ऑगस्टनिमित्त यांना सन्मानित करण्यात यावं अशी मागणी गुप्ता यांनी मोदींकडे केली आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या कालावधीमध्ये स्वदेशी लसींची निर्मिती करणाऱ्या वैज्ञानिकांचं मनोधैर्य वाढवण्यासाठी त्यांना भारतरत्नसारखा मोठा सन्मान देऊन गौरवण्यात यावं असं गुप्ता यांनी मोदींना लिहिलेल्या पत्रामध्ये म्हटलं आहे. तसेच "जागतिक महासाथीमुळे व्यापार आणि नियोजनाला मोठा फटका बसला आहे. कोरोनाच्या दोन लाटा भारतात येऊन गेल्या त्यामध्ये अनेकांनी आपल्या नातेवाईकांना आणि जवळच्या व्यक्तींना गमावलं आहे."

"तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवण्यात येत असून संपूर्ण देशासोबत झारखंडही पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली या अघोषित युद्धामध्ये लढण्यासाठी पूर्णपणे सज्ज असल्याचं देखील पत्रामध्ये गुप्ता यांनी म्हटलं आहे. देशांतर्गत निर्माण करण्यात आलेल्या कोरोना लसी आणि लसीकरणासंदर्भातील नियोजनबद्ध कार्यक्रमामध्ये अनेकांना कोरोनाच्या संसर्गापासून बऱ्याच मोठ्या प्रमाणात संरक्षण मिळाल्याचंही गुप्ता यांनी म्हटलं आहे. लसीकरणामुळे लोकांची रोगप्रतिकारशक्ती वाढली. त्यामुळे या साथीचा प्रभाव नियंत्रणात ठेवण्यात यश मिळालं. तसेच यामुळे जागतिक स्तरावर आत्मनिर्भर भारताचा संदेश पोहचला असंही गुप्ता यांनी म्हटलं आहे.

खूप कमी वेळामध्ये कोरोनापासून संरक्षण मिळवण्यासाठी लसींची निर्मिती करण्याच्या कामामध्ये सहभागी असणाऱ्यांचे पंतप्रधान मोदींनी देशाच्या वतीने जाहीर आभार मानले पाहिजेत, अशी इच्छाही गुप्ता यांनी व्यक्त केली आहे. कोरोना लसीच्या निर्मितीमध्ये मोलाचं योगदान देणाऱ्या या देशभक्त वैज्ञानिकांना स्वातंत्र्यदिनी भारतरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात यावं. पंतप्रधान मोदींनी असं केल्यास या वैज्ञानिकांकडे देशातील युवा पिढी आदर्श म्हणून पाहतील, असंही गुप्ता यांनी म्हटलं आहे. गुप्ता यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट देखील केलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

Web Title: ranchi jharkhand health minister asks pm modi to offer bharat ratna for vaccine scientists