राहुल गांधीमुळेच काँग्रेसचा पराभव - काँग्रेस नेत्याची टीका
By Admin | Updated: May 29, 2014 14:28 IST2014-05-29T10:44:30+5:302014-05-29T14:28:02+5:30
केरळमधील काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्याने पराभवासाठी राहुल गांधी यांना जबाबदार ठरवत त्यांच्यावर हल्ला चढवला आहे.

राहुल गांधीमुळेच काँग्रेसचा पराभव - काँग्रेस नेत्याची टीका
ऑनलाइन टीम
कोच्ची, दि. २८ - लोकसभा निवडणुकीत झालेल्या मानहानीकारक पराभवानंतर काँग्रेसमधून उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर थेट टीका होऊ लागली आहे. केरळमधील काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्याने पराभवासाठी राहुल गांधी यांना जबाबदार ठरवत त्यांच्यावर हल्ला चढवला आहे. राहुल गांधी पक्षातील पदांचा राजीनामा देत नसतील तर त्यांना हटवले पाहिजे, अशा शब्दांत माजी मंत्री टी. एच. मुस्तफा यांनी राहुल यांना लक्ष्य केले आहे. तसेच प्रियांका गांधी यांच्या हातात काँग्रेसची कमान सोपवावी, असेही ते पत्रकारांशी बोलताना म्हणाले.
या निवडणुकीत काँग्रेसला अतिशय दारूण पराभव स्वीकारावा लागल्याने सर्व कार्यकर्त्यांचे मनोधैर्य खचले आहे. या पराभवासाठी राहुल गांधीच जबाबादार असल्याचे मत पक्षातून व्यक्त होत होते. मात्र केरळमधील ज्येष्ठ नेते व माजी मंत्री टी. एच. मुस्तफा यांनी या मुद्यावर स्पष्टपणे मत मांडत राहुल यांच्यावर कठोर टीका केली. निवडणूकीच्या काळात ते (राहुल) कॉम्प्युटर, इंटरनेट व काँग्रेस कार्यकारिणीच्या काही खास सदस्यांच्या गटांमध्येच अडकून राहिले होते, त्यामुळे पक्षाला दारूण पराभव पत्करावा लागला, असे ते पत्रकारांशी बोलताना म्हणाले. तसेच या पराभवाची जबाबदारी घेऊन राहुल यांनी राजीनामा दिला पाहिजे. आणि जर ते पदांचा राजीनामा देत नसतील, तर त्यांना हटवून पक्षाची धुरा प्रियांका गांधी यांच्या हातात दिली पाहीजे, असे मतही त्यांनी व्यक्त केले.