राष्ट्रपतींनी दिलेली ईशान्य भारतीय शाल परिधान करणे राहुल गांधी यांनी टाळले, भाजपाची टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2026 09:24 IST2026-01-27T09:24:05+5:302026-01-27T09:24:59+5:30
Rahul Gandhi News: प्रजासत्ताक दिनानिमित्त राष्ट्रपती भवनामध्ये आयोजिक पारंपरिक अॅट होम रिसेप्शनदरम्यान, केलेल्या एका कृतीमुळे विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत

राष्ट्रपतींनी दिलेली ईशान्य भारतीय शाल परिधान करणे राहुल गांधी यांनी टाळले, भाजपाची टीका
प्रजासत्ताक दिनानिमित्त राष्ट्रपती भवनामध्ये आयोजिक पारंपरिक अॅट होम रिसेप्शनदरम्यान, केलेल्या एका कृतीमुळे विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. या कार्यक्रमाची संकल्पना आणि सजावट ही ईशान्य भारतामधील राज्यांना समर्पित होती. त्यानिमित्ताने या कार्यक्रमामध्ये उपस्थित असलेल्या सर्व पाहुण्यांना ईशान्य भारताची ओखळ असलेली एक खास शाल देण्यात आली. मात्र राष्ट्रपतींकडून देण्यात आलेली ही शाल राहुल गांधी यांनी स्वीकारली नाही. त्यावरून आता सत्ताधारी भाजपाकडून राहुल गांधींवर टीका करण्यात येत आहे.
राष्ट्रपती भवनामध्ये आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमामध्ये यावेळी ईशान्य भारताला केंद्रस्थानी ठेवण्यात आले होते. तसेच कार्यक्रमावेळी येणाऱ्या सर्व पाहुण्यांना भारतीय परंपरेप्रमाणे येणाऱ्या प्रत्येक पाहुण्याचं स्वागत हे ईशान्य भारतातील पारंपरिक शाल देऊन करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते केंद्रीय मंत्र्यांपर्यंत आणि प्रजासत्ताक दिनासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेल्या युरोपियन युनियनच्या नेत्यांपासून विविध देशांच्या राजदूतांपर्यंत सर्वांना ही शाल देण्यात आली. तिचा मान राखत सर्वांनी ही शाल खांद्यावर घेतली. मात्र राहुल गांधी यांनी ही शाल स्वीकारली नाही.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी स्वत: राहुल गांधी यांनी ईशान्य भारताची ओखळ असलेली ही शाल दिली होती. मात्र संपूर्ण कार्यक्रमात ही शाल खांद्यावर न घेणारे राहुल गांधी हे एकमेव पाहुणे होते, असा दावा करण्यात येत आहे. एवढंच नाही तर शाल खांद्यावर घेण्याबाबत राष्ट्रपतीनींही त्यांना आठवण करून दिली होती. मात्र राहुल गांधी यांनी ही शाल खांद्यावर घेण्याऐवजी ती हातात ठेवणेच पसंत केले.
दरम्यान, राहुल गांधी यांनी केलेली ही कृती शिष्टाचाराकडे केलेलं दुर्लक्ष होतं की ईशान्य भारतातील परंपरेबाबत असलेली त्यांची अनास्था होती, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. आता याबाबत भाजपाकडून टीका केली जात आहे. मात्र काँग्रेसकडून अद्याप यावर प्रतिक्रिया समोर आलेली नाही.