अमेरिकेसोबतचा ट्रेड करार रद्द करण्याची हिम्मत दाखवा; राहुल गांधींचे पंतप्रधान मोदींना आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2026 16:33 IST2026-02-24T16:31:25+5:302026-02-24T16:33:12+5:30
Rahul Gandhi on Narendra Modi: 'नरेंद्र मोदींनी मंत्रिमंडळाची परवानगी न घेता अमेरिकेसोबत ट्रेड डील केली.'

अमेरिकेसोबतचा ट्रेड करार रद्द करण्याची हिम्मत दाखवा; राहुल गांधींचे पंतप्रधान मोदींना आव्हान
Rahul Gandhi on Narendra Modi: मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये आयोजित किसान महा-चौपालमध्ये काँग्रेस खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. अमेरिका-भारत ट्रेड डील, चीनसोबतचा सीमा वाद आणि कॉर्पोरेट संबंधांच्या मुद्द्यावर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर गंभीर आरोप केले. चीनच्या घुसखोरीबाबत माजी लष्करप्रमुख जनरल नरवणे यांच्या पुस्तकाचा संदर्भ देत, या विषयावर पंतप्रधानांच्या कथित मौनावर त्यांनी प्रश्न उपस्थित केले.
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
ट्रेड डीलवरून मोदी सरकारवर टीका
राहुल गांधी पुढे म्हणाले की, भारत आणि अमेरिका यांच्यातील ट्रेड डील चार महिन्यांपासून रखडलेली होती. कारण कृषी क्षेत्राशी संबंधित होते. सरकारला अमेरिकेतील मोठ्या कंपन्यांना सोयाबीन, कापूस आणि मका भारतात विकण्याची परवानगी द्यायची नव्हती. शेतकरीही याच्या विरोधात होते. चार महिने चर्चा थांबलेली असताना, माझ्या भाषणानंतर संध्याकाळीच पंतप्रधान मोदींनी मंत्रिमंडळाची परवानगी न घेता ट्रम्प यांना फोन केला.
पंतप्रधान मोदी यांनी आपल्या मंत्रिमंडळाशी चर्चा न करता थेट डोनाल्ड ट्रम्प यांना फोन करून ट्रेड डील केली. या डीलमुळे देशातील शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने ट्रम्प यांच्या टॅरिफ निर्णयावर स्थगिती दिल्याचा उल्लेख करत राहुल गांधी म्हणाले, आता जर पंतप्रधान मोदींमध्ये हिंमत असेल, तर त्यांनी ही ट्रेड डील रद्द करून दाखवावी, असे आवाहन राहुल गांधींनी केले.
नरेंद्र मोदी COMPROMISED हैं और ये उनकी आंखों में दिखता है। pic.twitter.com/7RzkcCAMKU
— Congress (@INCIndia) February 24, 2026
चीन घुसखोरीचा मुद्दा आणि नरवणे यांच्या पुस्तकाचा संदर्भ
राहुल गांधी यांनी आपल्या भाषणात सांगितले की, राष्ट्रपतींच्या अभिभाषणानंतर लोकसभेत पहिला वक्ता म्हणून विरोधी पक्षनेत्याला बोलण्याची परंपरा आहे. मात्र, देशाच्या इतिहासात प्रथमच लोकसभेत विरोधी पक्षनेत्याला बोलू दिले गेले नाही. मी बोलायला सुरुवात केली, तेव्हा मला रोखण्यात आले. मी जनरल नरवणे यांच्या पुस्तकाचा उल्लेख केला, तेव्हाही मला थांबवण्यात आले. नरवणे यांनी आपल्या पुस्तकात लिहिल्याप्रमाणे, चीनचे टँक भारतीय हद्दीत घुसत असताना त्यांनी तत्कालीन संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांना फोन केला, मात्र प्रतिसाद मिळाला नाही.
अजित डोभाल आणि जयशंकर यांचाही प्रतिसाद नाही
राहुल गांधी यांच्या म्हणण्यानुसार, नरवणे यांनी त्यानंतर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल आणि परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण तिथूनही कोणताही स्पष्ट आदेश मिळाला नाही. चीनची सेना आत शिरत होती आणि लष्करप्रमुखांना काय करावे याबाबत कोणताही आदेश मिळत नव्हता. अखेर संरक्षणमंत्र्यांनी पंतप्रधानांना फोन केला, तेव्हा पंतप्रधानांनी सांगितले, लष्करप्रमुख जे योग्य समजतील ते करा. नरवणे यांनी आपल्या पुस्तकात लिहिले की, त्या दिवशी पंतप्रधानांनी त्यांना एकटे सोडले, असा दावा राहुल गांधी यांनी केला