'अमित शाह घाबरले, त्यांचे हातही थरथरत होते...', राहुल गांधींचा गृहमंत्र्यांवर निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2025 15:21 IST2025-12-11T15:19:42+5:302025-12-11T15:21:27+5:30
Rahul Gandhi On Amit Shah: 'संसदेत अमित शाह यांचे वर्तन असामान्य होते. त्यांनी अश्लील भाषा वापरली आणि हे संपूर्ण संसदेने पाहिले.'

'अमित शाह घाबरले, त्यांचे हातही थरथरत होते...', राहुल गांधींचा गृहमंत्र्यांवर निशाणा
Rahul Gandhi On Amit Shah: काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या संसदेतील भाषणावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. संसद संकुलात माध्यमांशी बोलताना राहुल गांधी म्हणाले की, अमित शाह यांनी त्यांच्या प्रश्नांची थेट उत्तरे दिली नाहीत किंवा कोणतेही पुरावे सादर केले नाहीत. त्यांनी दावा केला की, शाह घाबरलेले दिसत होते आणि त्यांचे हातही थरथरत होते.
शाहांचे वर्तन असामान्य, हात थरथरत होते
राहुल गांधींनी आरोप केला की, संसदेत अमित शाह यांचे वर्तन असामान्य होते. त्यांनी अश्लील भाषा वापरली आणि हे संपूर्ण संसदेने पाहिले. मी पत्रकार परिषदेत उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी सभागृहात अमित शाह यांना उघड आव्हान दिले होते, परंतु शाहांनी या आव्हानाला उत्तर दिले नाही. संसदेतील त्यांच्या वागण्यावरुन ते मानसिक दबावाखाली दिसत होते.
#WATCH | Delhi | On Union Home Minister Amit Shah's speech in the Parliament yesterday, Congress MP and Lok Sabha LoP Rahul Gandhi says, "Amit Shah ji was very nervous yesterday. He used the wrong language, his hands were trembling... He is under tremendous mental pressure.… pic.twitter.com/O7rXBMAzBu
— ANI (@ANI) December 11, 2025
RSS वरही टीकेची झोड
राहुल गांधी यांनी या दरम्यान राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर (RSS)ही तीव्र आरोप केले. निवडणूक सुधारांवरील चर्चेत बोलताना त्यांनी दावा केला की, RSS च्या ‘प्रोजेक्ट’नुसार देशातील अनेक संस्था आणि निवडणूक आयोगावर कब्जा केला गेला आहे. मुख्य न्यायाधीशांना निवडणूक आयुक्तांच्या निवडीसाठीच्या समितीतून का वगळले? सरकारने 2023 मध्ये कायदाच बदलला, जेणेकरून कोणत्याही निवडणूक आयुक्ताला त्यांच्या निर्णयांबद्दल जबाबदार धरणे कठीण होईल.
जर मताचे महत्त्व राहिलेच नाही, तर लोकसभा, विधानसभा, पंचायत आणि कोणतीही लोकशाही संस्था अस्तित्वात राहणार नाही. महात्मा गांधी यांच्या हत्येनंतर RSS-BJP च्या प्रोजेक्टचा पुढचा टप्पा म्हणजे भारताच्या संस्थात्मक रचनेवर नियंत्रण मिळवणे हा होता, अशी टीकाही राहुल गांधी यांनी केली.