Punjab Flood : पुराचे थैमान! पंजाबमधील मृतांचा आकडा ५१ वर; पिकं पाण्याखाली, शेतकऱ्यांना आता मोठा दिलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2025 11:38 IST2025-09-09T11:37:10+5:302025-09-09T11:38:16+5:30
Punjab Flood : पुरामुळे आतापर्यंत १५ जिल्ह्यांतील ३.८७ लाखांहून अधिक लोक प्रभावित झाले आहेत आणि सुमारे १.८४ लाख हेक्टरवरील पिकांचं मोठं नुकसान झालं आहे.

Punjab Flood : पुराचे थैमान! पंजाबमधील मृतांचा आकडा ५१ वर; पिकं पाण्याखाली, शेतकऱ्यांना आता मोठा दिलासा
पंजाबमधीलपूरस्थिती अजूनही गंभीर आहे. सध्या राज्यात पाऊस पडत नसला तरी आणि काही दिवसांत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. परंतु गेल्या काही दिवसांत आलेल्या पुराचे परिणाम अजूनही भयावह आहे. गेल्या २४ तासांत मानसा, मोगा आणि पटियाला जिल्ह्यात आणखी ३ जणांचा मृत्यू झाल्यानंतर मृतांचा आकडा ५१ वर पोहोचला आहे.
पुरामुळे आतापर्यंत १५ जिल्ह्यांतील ३.८७ लाखांहून अधिक लोक प्रभावित झाले आहेत आणि सुमारे १.८४ लाख हेक्टरवरील पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. सरकारने मदतीसाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. पंजाब मंत्रिमंडळाने शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे आणि पूरग्रस्त शेतांसाठी प्रति एकर २०,००० रुपये भरपाई जाहीर केली आहे. ‘जिसदा खेत, उसकी रेत’ योजना मंजूर करण्यात आली आहे, ज्याअंतर्गत शेतकरी पुरानंतर शेतात साचलेली वाळू काढू शकतील आणि विकू शकतील. यामुळे त्यांना त्यांचे नुकसान भरून काढण्यास मदत होईल.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अनेक बाधित गावांमध्ये पाण्याची पातळी कमी झाल्यामुळे परिस्थिती सुधारू लागली आहे.बियास नदीवर बांधलेल्या पोंग धरणाची पाण्याची पातळी १,३९०.७४ फूट झाली आहे, तर एक दिवस आधी ती १,३९२.२० फूट होती. धरणातील पाण्याचा प्रवाह रविवारी ३६,९६८ क्युसेकवरून ३४,५८० क्युसेकवर आला आहे. भाक्रा धरणातील पाण्याची पातळी देखील १,६७७.२ फुटावर आली आहे. सतत देखरेख आणि पाण्याची पातळी कमी झाल्यामुळे पूरग्रस्त भागात काही प्रमाणात दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.
महसूल मंत्री हरदीप सिंग मुंडियां म्हणाले की, आतापर्यंत १,८४,९३८ हेक्टरवरील पिकं पुरामुळे उद्ध्वस्त झाली आहेत. घरं आणि पशुधनाच्या नुकसानीचे मूल्यांकन अद्याप सुरू आहे आणि पाणी ओसरल्यानंतर संपूर्ण तपशील समोर येईल. त्याच वेळी पठाणकोट जिल्ह्यात तीन लोक अजूनही बेपत्ता आहेत. पंजाबमधील या पुराचा केवळ कृषी उत्पादनावरच नव्हे तर ग्रामीण अर्थव्यवस्थेवरही खोलवर परिणाम होईल असं तज्ज्ञांचं मत आहे.