नवी दिल्ली - राजधानी दिल्लीत प्रजासत्ताक दिनी शेतकऱ्यांनी आयोजित केलेल्या ट्रॅक्टर मोर्चाला लागलेल्या हिंसक वळणामुळे तणावपूर्ण परिस्थिती आहे. सकाळी ट्रॅक्टर रॅलीला सुरुवात झाल्यावर या आंदोलनाला हिंसक वळण लागून शेतकरी आंदोलकांनी थेट लाल किल्ल्यापर्यंत मुसंडी मारली. तसेच लाल किल्ल्यावर धार्मिक ध्वज फडकवला. त्यानंतर, सोशल मीडियावर रान उठवलं गेलं. आंदोलकांनी तिरंगा झेंडा उतरवल्याचा आरोप काही जणांनी केला, तर लाल किल्ल्यावर खलीस्तानी झेंडा फडकवल्याचेही मेसेज सोशल मीडियावर व्हायरल झाले. मात्र, आंदोलकांनी या दोन्हीही कृती केल्या नाहीत.
दिल्लीतील शेतकरीआंदोलनादरम्यान, लाल किल्ल्यावर आंदोलनतकर्त्यांनी झेंडा फडकवल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यानंतर, या व्हिडिओसह कॅप्शन देऊन व्हिडिओ व्हायरलही होत आहे. आंदोलकांनी खलीस्तानी ध्वज लाल किल्ल्यावर फडकवल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, आंदोलकांनी लाल किल्ल्यावर फडकवलेला ध्वज खलिस्तानी नसून तो शीख धर्मियांचा धार्मिक ध्वज आहे. या ध्वजाला निशाण साहिब असं म्हणातात. खलीस्तानी झेंड्यावर खलीस्तान असा स्पष्ट उल्लेख असतो, त्यामुळे तो दावा खोटा असल्याचं वृत्त इंडिया टुडेनं दिलंय. तसेच, आंदोलकांनी तिरंगा ध्वज हटविल्याचेही सांगण्यात येते. मात्र, आंदोलकांनी रिकाम्या खांबावरच हे निशाण साहिब फडकवले असून लाल किल्ल्यावर तिरंगा डौलाने फडकत असल्याचे दिसत आहे.
बहुतांश नेटकर्यांनी एएनआय वृत्तसंस्थेचा व्हिडीओ शेअर करून दावे केले आहेत. या व्हिडीओमध्ये एक आंदोलक एका दांडीवर चढून झेंडा फडकावताना दिसत आहे. या दांडीवर कुठलाही झेंडा नव्हता. आंदोलकानी या दांडीवरील कुठलाही झेंडा काढलेला नव्हता. लाल किल्ल्यावर सर्वात उंचीवर तिरंगा फडकताना दिसत आहे. या झेंड्याशी कुठल्याही आंदोलनकर्त्यानी छेडछाड केल्याचे कुठेही दिसत नाही. इंडिया टुडेच्या घटनास्थळी उपस्थित असलेल्या पत्रकाराने या घटनेला दुजोरा दिला आहे. तसेच, द न्यूज मिनट या वेबसाईटनेही असेच म्हटलंय.
एएनआयच्या व्हिडीओतील दृश्याप्रमाणे लाला किल्ल्यावरील एका खांबावर फडकविण्यात आलेला ध्वज हे निशाण साहिब असून त्यावर तलवारीचे चिन्ह आहे. हे चिन्ह गुरू गोविंद सिंह यांच्या काळात वापरले जायचे. मात्र, तरीही लाल किल्ल्यावर कुठल्याही धर्माचा ध्वज फडकवणे योग्य नसल्याचं मत अनेकांनी व्यक्त केलंय. लाल किल्ल्यावर केवळ तिरंगाच फडकला पाहिजे, त्यावर धार्मिक ध्वज फडकता कामा नये, असे मत सुज्ञ व्यक्तींनी सोशल मीडियातून व्यक्त केलंय.