सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री होताच पंतप्रधान मोदींची पोस्ट; म्हणाले, "मला विश्वास आहे की, अजित पवारांचे स्वप्न..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2026 18:18 IST2026-01-31T18:17:13+5:302026-01-31T18:18:45+5:30
PM Modi Sunetra Pawar: अजित पवार यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यांचा शपथविधी पार पडल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी सुनेत्रा पवार यांना शुभेच्छा दिल्या.

सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री होताच पंतप्रधान मोदींची पोस्ट; म्हणाले, "मला विश्वास आहे की, अजित पवारांचे स्वप्न..."
PM Modi Sunetra Pawar Latest News: सुनेत्रा पवार यांनी महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. मुंबईतील लोकभवनात सायंकाळी पाच वाजता त्यांचा शपथविधी पार पडला. त्यांनी पदाची शपथ घेतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक पोस्ट करत त्यांच्या पुढील कार्याला शुभेच्छा दिल्या. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी अजित पवार यांचाही उल्लेख केला.
लोकभवनामधील सभागृहात सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा पार पडला. राज्यपाला आचार्य देवव्रत यांनी सुनेत्रा पवार यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. शपथ घेताच त्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री बनल्या.
पंतप्रधान मोदी काय म्हणाले?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शपथ घेतल्यानंतर पोस्ट करत त्यांचे अभिनंदन केले. मोदी म्हणाले, "महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून कार्यकाळ सुरू करणाऱ्या सुनेत्रा पवार जी यांना शुभेच्छा. मला विश्वास आहे की त्या राज्यातील जनतेच्या कल्याणासाठी अथक परिश्रम करतील आणि दिवंगत अजितदादा पवार यांचे स्वप्न पुढे नेतील", अशा भावना व्यक्त करत मोदींनी सुनेत्रा पवार यांना शुभेच्छा दिल्या.
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे अधिकार सुनेत्रा पवारांना
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या विधिमंडळ पक्षाची आज बैठक झाली. त्या बैठकीमध्ये दोन ठराव मंजूर करण्यात आले. यात पहिला ठराव त्यांची गटनेता म्हणून निवड करण्यात आली. तर दुसरा ठराव राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निर्णय घेण्याचे सर्वाधिकार त्यांना देण्यात आले आहेत.
उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष कोण होणार, याबद्दलचा निर्णय अद्याप प्रलंबित आहे. त्यामुळे कोण अध्यक्ष होणार आणि राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाचे विलिनीकरण होणार का? ही चर्चा कायम आहे.