1948 मध्ये PoK, 1996 मध्ये पाकला मोस्ट फेवर्ड नेशन...BJPने काँग्रेसच्या शरणागतींचा पाढा वाचला
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2025 14:18 IST2025-06-04T14:17:25+5:302025-06-04T14:18:10+5:30
काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या आत्मसमर्पण विधानावरून आता राजकारण तापले आहे. काँग्रेसने आतापर्यंत कधी-कधी शरणागती पत्कारली, याचा पाढाच भाजपने वाचला आहे.

1948 मध्ये PoK, 1996 मध्ये पाकला मोस्ट फेवर्ड नेशन...BJPने काँग्रेसच्या शरणागतींचा पाढा वाचला
Congress vs BJP : काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या आत्मसमर्पण विधानावरून आता राजकारण तापले आहे. राहुल गांधींनी अलिकडेच पंतप्रधान मोदींनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशावरून आत्मसमर्पण केल्याची टीका केली होती. आता त्यांच्या विधानावरून भाजपने त्यांना कोंडीत पकडले आहे. भाजपने काँग्रेसला त्यांनी कधी-कधी आत्मसमर्पण केले, याची आठवण करून दिली.
भाजप नेते सुधांशू त्रिवेदी यांनी पत्रकार परिषद घेऊन राहुल गांधींच्या विधानाला प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले की, राहुल गांधी यांनी सैन्याच्या शौर्याची तुलना आत्मसमर्पणाशी केल्याने त्यांची आजारी मानसिकता दिसून येते. राहुल गांधींनी ज्या प्रकारचे विधान केले, कोणत्याही पाकिस्तानी संघटनेने तशाप्रकारचे विधान केलेले नाही. तुमचे विधान सैन्याचा अपमान करणारे आहे. तुम्ही (राहुल गांधी) पाकिस्तानचे प्रमुख बनण्याचा प्रयत्न करत आहात, अशी टीका त्रिवेदी यांनी केली.
सुधांशू त्रिवेदी यांनी पुढे म्हटले की, राहुल गांधींमध्ये विरोधी पक्षनेत्याचे गांभीर्य नाही. पाकिस्तानचा कोणताही दहशतवादी आणि लष्करी अधिकारी, मसूद अझहर किंवा हाफिज सईदनेही जे जे म्हटले नाही, ते राहुल गांधी आज म्हणत आहेत. राहुल गांधींनी आत्मसमर्पण हा शब्द वापरून सैन्याचा अपमान केला. इतिहासात तुम्ही कधी-कधी आत्मसमर्पण केले, हे देवालाच माहिती आहे. १९४८ मध्ये तुम्ही शरणागती पत्कारुन काश्मीरचा काही भाग पाकिस्ताना दिला. तुमच्या कृतींकडे पाहिले तर कॅलेंडर शरणागतीनेचे भरलेले आहे.
राहुल गांधींनी आपल्या सैन्याच्या शौर्याची आणि ऑपरेशन सिंदूरच्या यशाची तुलना शरणागतीशी केली, यावरुन त्यांची मानसिकता किती आजारी आणि धोकादायक बनली आहे, हे दिसून येते. तुमचे कॅलेंडर तर तुमच्या पक्षाच्या आणि कुटुंबाच्या शरणागतीनेच भरलेले आहे. आमचे पंतप्रधान सिंह आहेत. तुम्ही पंतप्रधानांविरुद्ध बोलू शकता, भाजपविरुद्ध बोलू शकता, आम्ही ते स्वीकारतो, परंतु भारताविरुद्ध, भारताच्या सार्वभौमत्वाविरुद्ध आणि सैन्याविरुद्ध कोणतेही विधान आम्हाला मान्य नाही, अशी टीकाही त्रिवेदी यांनी केली.
LIVE: BJP National Spokesperson Dr. @SudhanshuTrived addresses press conference at BJP HQ, New Delhi. https://t.co/XXCMYTNvWc
— BJP (@BJP4India) June 4, 2025
काँग्रेसच्या आत्मसमर्पणाचे कॅलेंडर
- २०२३ मध्ये स्वतःला लोकशाहीचे रक्षक म्हणवणारे राहुल गांधी अमेरिकेत भारताविरुद्ध बोलले.
- २०११ मध्ये राहुल गांधींनी दहशतवाद थांबवणे अशक्य असल्याचे म्हटले होते, ते एक आत्मसमर्पण होते.
- २००९ मध्ये शर्म अल-शेखमधील दहशतवादी हल्ल्यानंतरही मनमोहन सिंग सरकारने संवाद थांबवला नव्हता, ते एक आत्मसमर्पण होते.
- १९९६ मध्ये पाकिस्तानला मोस्ट फेवर्ड नेशनचा दर्जा देणे हे एक आत्मसमर्पण होते.
- १९७१ मध्ये युद्ध जिंकल्यानंतरही पीओके ताब्यात घेण्यात आले नाही, उलट ९३ हजार युद्धकैदी परत केले, तेही एक आत्मसमर्पण होते.
- १९६५ मध्ये ताश्कंदमध्ये जे घडले, ते एक आत्मसमर्पण होते. तेव्हा आपण लाहोरपासून फक्त २० किलोमीटर अंतरावर होतो, पण काहीही का केले नाही.
- १९६२ मध्ये अक्साई चीनला शरणागती पत्करावी लागली.
- १९६२ मध्ये केनेडी यांना एक पत्र लिहिले होते, जे आता उघड करण्यात आले आहे. त्यावेळी त्यांनी युद्ध साहित्य, बॉम्बर आणि वैमानिक मागितले होते, ती शरणागती होती.
- १९६० मध्ये सिंधू नदीचे ८०% पाणी पाकिस्तानला देण्यात आले होते, ती शरणागती होती.
- १९४८ मध्ये पीओके पाकिस्तानला देण्यात आले, ती शरणागती होती.
- १९४७ मध्ये जिनासमोर नतमस्तक होऊन देशाचा एक तृतीयांश भाग देणे शरणागती होती.
राहुल गांधींनी काय विधान केले?
काँग्रेस खासदार राहुल गांधी मंगळवारी मध्य प्रदेशच्या दौऱ्यावर होते. यावेळी राहुल म्हणाले होते की, मी भाजप आणि आरएसएसच्या लोकांना चांगले ओळखतो. ते थोड्याशा दबावाने घाबरून पळून जातात. ट्रम्प यांनी फोन केला आणि नरेंद्र मोदींनी लगेच शरणागती पत्करली. अमेरिकेच्या धमकीला न जुमानता भारताने १९७१ मध्ये पाकिस्तान तोडला. काँग्रेसचे वाघ महासत्तांशी लढतात, कधीही झुकत नाहीत.