“तेव्हाच सरदार पटेल POK ताब्यात घेणार होते, पण...”; पंतप्रधान मोदींनी सांगितली Inside Story
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2025 14:10 IST2025-05-27T14:09:34+5:302025-05-27T14:10:28+5:30
PM Narendra Modi In Gandhinagar: त्याच दिवशी दहशतवाद्यांना जन्माची अद्दल घडवायला हवी होती. परंतु, तसे झाले नाही आणि त्याचे परिणाम आपण गेली ७५ वर्षे भोगत आहोत, असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.

“तेव्हाच सरदार पटेल POK ताब्यात घेणार होते, पण...”; पंतप्रधान मोदींनी सांगितली Inside Story
PM Narendra Modi In Gandhinagar: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात अनेक कठोर पावले उचलली आहेत. तसेच या निर्णयांवर भारत ठाम असल्याचे पाहायला मिळत आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवत भारत काय करू शकतो, याची एक चुणूक पाकिस्तानसह जगाला दाखवण्यात आली आहे. यानंतर आता भारतीय खासदारांचे शिष्टमंडळ जगभरातील अनेक देशांमध्ये जाऊन भारताची बाजू मांडत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर आहेत. गांधीधाम येथे एका सभेला पंतप्रधान मोदी यांनी संबोधित केले. तत्पूर्वी मोठा रोड शो करण्यात आला.
सभेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १९४७ वेळी भारताची फाळणी झाली. तेव्हा घडलेल्या काही गोष्टींचा उल्लेख केला. पंतप्रधान मोदी म्हणाले की, जेव्हा १९४७ रोजी देशाची फाळणी झाली, तेव्हा काही साखळदंडातून मुक्तता व्हायला हवी होती. परंतु, हातातील बळ संपुष्टात आणण्यात आले. देशाचे तीन तुकडे करण्यात आले. त्याच रात्री पहिला दहशतवादी हल्ला काश्मीर खोऱ्यात करण्यात आला. देशाचा एक भाग दहशतवादाच्या बळावर पाकिस्तानने हडपला. त्याच दिवशी या दहशतवाद्यांना जन्माची अद्दल घडवायला हवी होती. सरदार पटेल यांची तेव्हा अशीच इच्छा होती की, जोपर्यंत पाकव्याप्त काश्मीर भारतात परत येत नाही, तोपर्यंत सैन्याने थांबता कामा नये. मागे हटता कामा नये. परंतु, सरदार पटेल यांचे ऐकले नाही. याच दहशतवाद्यांना भारताला रक्तबंबाळ करण्याचे काम पुढे ७५ वर्ष सुरू ठेवले, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
७५ वर्ष आपण केवळ सहन करत आहोत
पहलगाम येथे झालेला हल्लाही याच विकृतीचा भाग होता. गेली ७५ वर्ष आपण केवळ सहन करत आहोत. जेव्हा जेव्हा पाकिस्तानशी युद्ध करायची वेळ आली, तेव्हा तेव्हा तीनही वेळा भारताच्या सैन्याने पाकिस्तानला पराभवाची धूळ चारली, असे पंतप्रधान मोदी यांनी नमूद केले. ०६ मेच्या रात्री ‘ऑपरेशन सिंदूर’ राबण्यात आले. पण आता ‘ऑपरेशन सिंदूर’ जनबळावर पुढे नेण्यात येईल. जनतेने आता देशाच्या विकासात सहभागी व्हायला हवे. आपली जबाबदारी घ्यावी. २०४७ पर्यंत भारताला विकसित राष्ट्र करायचे आहे. भारताची अर्थव्यवस्था चौथ्या क्रमांकावरून तिसऱ्या क्रमांकावर न्यायची आहे, त्यासाठी जनतेने हातभार लावावा. परदेशी वस्तू वापरणार नाही, असा संकल्प घ्यावा, असे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी यावेळी देशाला केले.
दरम्यान, सर्जिकल स्ट्राईकनंतर अनेकांनी सरकारकडे पुराव्यांची मागणी केली होती. म्हणून यावेळी सगळ्या गोष्टी कॅमेरासमोरच केल्या. अवघ्या २२ मिनिटांत दहशतवाद्यांची ९ तळे उद्ध्वस्त करण्यात आली. नंतर कुणी पुरावे नाहीत, अशी बोंब करू नये, म्हणून यावेळी आधीच कॅमेऱ्यांची पूर्ण व्यवस्था केली होती. ६ मेची ती दृश्य बघितल्यावर कुणीही याला प्रॉक्सी वॉर म्हणू शकत नाही. यावेळी आम्हाला पुरावे द्यावे लागले नाहीत, त्यांनी समोरूनच परिस्थिती दाखवली, असे पंतप्रधान मोदी यांनी विरोधकांना सुनावले.
#WATCH | Gandhinagar: Prime Minister Narendra Modi says "In 1947, when Maa Bharti was partitioned, 'katni chahiye thi zanjeerein par kaat di gayi bhujayein'. The country was divided into three parts. On that very night, the first terrorist attack took place in Kashmir. A part of… pic.twitter.com/f3cynvw0Tv
— ANI (@ANI) May 27, 2025