"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2025 15:50 IST2025-06-15T15:49:21+5:302025-06-15T15:50:19+5:30
जर १४९ देश एकत्र येत असतील आणि आपले पंतप्रधान तिथे जात नसतील तर ही खूप मोठी चूक आहे असं त्यांनी म्हटलं.

"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
मुंबई - इराण आणि इस्त्रायल यांच्यातील संघर्षाचे पडसाद जागतिक पातळीवर उमटत आहेत. इराणच्या बाजूने चीन, रशिया आणि पाकिस्ताननेही भूमिका घेतली आहे तर अमेरिका उघडपणे इस्त्रायलच्या बाजूने उभी राहिली आहे. या दोन्ही देशाच्या संघर्षात भारताने कोणाचीही बाजू न घेता शांततेची भूमिका मांडली आहे. त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी मोठी चूक करतायेत असं म्हणत समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी इराण-इस्त्रायल युद्धात भारताच्या भूमिकेवरून टीका केली आहे.
आमदार अबू आझमी म्हणाले की, अटलबिहारी वाजपेयी यांनी पॅलेस्टाईन स्वातंत्र्य झाले पाहिजे आणि लवकरात लवकर इस्त्रायलने ते खाली करायला हवे असं म्हटले होते. जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी यांच्यासह जितके पंतप्रधान झाले त्यांनीही पॅलेस्टाईनचं समर्थन केले आणि इस्त्रायलविरोधात भूमिका घेतली होती. आज १४९ देश पॅलेस्टाईनचे समर्थन करत आहेत. तिथे जे अत्याचार होतायेत त्याचा निषेध झाला पाहिजे. पॅलेस्टाईन स्वातंत्र्य झाले पाहिजे अशी मागणी करत आहेत. जर १४९ देश एकत्र येत असतील आणि आपले पंतप्रधान तिथे जात नसतील तर ही खूप मोठी चूक आहे असं त्यांनी म्हटलं.
त्याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी जाणुनबुजून हे काम करत आहेत. जनता त्यांना माफ करणार नाही. आपल्या जुन्या नेत्यांनी घेतलेल्या भूमिकांविरोधात, आपल्या परराष्ट्र धोरणाविरोधात मोदी काम करत आहेत. हे ठीक नाही असंही आमदार अबू आझमी यांनी सांगितले. सध्या इराण-इस्त्रायल या दोन्ही देशात संघर्ष सुरू आहे. अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनीही इराणला धमकी दिली आहे. जर यूएस सैन्य तळांवर हल्ले झाले तर अमेरिका मागे हटणार नाही असा इशारा दिला आहे.
Mumbai, Maharashtra: On Israel-Iran tension, Samajwadi Party state president and MLA Abu Asim Azmi says, "Our leader Atal Bihari Vajpayee had said that Palestine should be free and Israel should be evacuated as soon as possible. Former Prime Ministers of our country, like… pic.twitter.com/3sMNOpEfn7
— IANS (@ians_india) June 15, 2025
औवेसी यांनी केंद्र सरकारकडे केली मागणी
मध्य पूर्वेत इराण-इस्त्रायल यांच्यातील संघर्षात औवेसी यांनी इराणमध्ये १५९५ भारतीय विद्यार्थी अडकल्याचे सांगितले. त्यातील १४० मेडिकल विद्यार्थी तेहरानमध्ये शिक्षण घेत आहेत. औवेसी यांनी परराष्ट्र मंत्रालयाशी संपर्क साधून अडकलेल्या विद्यार्थ्यांची माहिती दिली. तेलंगणातील या विद्यार्थ्यांना सुरक्षित भारतात आणण्याची मागणी त्यांनी केली. इराण-इस्त्रायल संघर्षामुळे केवळ या २ देशाची नव्हे तर आसपासच्या देशांमधील स्थिती अस्थिर झाली आहे. या देशातील एअरस्पेस बंद आहेत. सातत्याने मिसाईल, ड्रोन हवाई हल्ल्यांच्या बातम्या पुढे येत आहेत. त्यामुळे इराण आणि इस्त्रायलमधील भारतीय दूतावास कार्यालयाने तिथल्या भारतीय नागरिकांना सतर्क आणि सुरक्षित राहण्याचे आवाहन केले आहे.