Shocking: तंबाखूचं व्यसन जीवावर बेतलं! रेल्वे रूळावर थुंकायला गेला अन् वंदे भारतनं उडवलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2026 20:18 IST2026-03-25T20:17:08+5:302026-03-25T20:18:43+5:30
Vande Bharat Express Hits Man: रेल्वे प्रवाशांसाठी एक अत्यंत धक्कादायक आणि डोळे उघडणारी घटना समोर आली. तंबाखू चघळल्यानंतर रेल्वे रुळावर थुंकण्यासाठी गेलेल्या एका व्यक्तीला सुसाट आलेल्या वंदे भारत एक्सप्रेसने जोरदार धडक दिली.

Shocking: तंबाखूचं व्यसन जीवावर बेतलं! रेल्वे रूळावर थुंकायला गेला अन् वंदे भारतनं उडवलं
रेल्वे प्रवाशांसाठी एक अत्यंत धक्कादायक आणि डोळे उघडणारी घटना समोर आली. तंबाखू चघळल्यानंतर रेल्वे रुळावर थुंकण्यासाठी गेलेल्या एका व्यक्तीला सुसाट आलेल्या वंदे भारत एक्सप्रेसने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात त्या व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. ही घटना पूर्व मध्य रेल्वेच्या दानापूर विभागांतर्गत येणाऱ्या बरह रेल्वे स्थानकावर मंगळवारी सकाळी घडली.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास पाटणा-हावडा वंदे भारत एक्सप्रेस बरह स्थानकावरून जाणार होती. यावेळी प्लॅटफॉर्म क्रमांक २ वर उभा असलेला एक प्रवासी तंबाखू चघळत होता. थुंकण्यासाठी तो प्लॅटफॉर्मच्या अगदी कडेला गेला. दुर्दैवाने, त्याच वेळी वंदे भारत ट्रेन स्थानकात आली. ट्रेनचा वेग इतका जास्त होता की, त्या व्यक्तीला बाजूला होण्याची संधीही मिळाली नाही. ट्रेनने दिलेल्या जोरदार धडकेमुळे तो व्यक्ती प्लॅटफॉर्मवर फेकला गेला आणि त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.
रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू
घटनेची माहिती मिळताच बख्तियारपूर आरपीएफचे निरीक्षक जव्हार लाल आणि जीआरपीचे १२ जवान तात्काळ घटनास्थळी पोहोचले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या जखमी व्यक्तीला तातडीने बरह सदर रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, जखम खोल असल्याने उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
मृताची ओळख अद्याप अस्पष्ट
दानापूर आरपीएफचे कमांडंट उदय सिंग पवार यांनी सांगितले की, या घटनेबाबत अनैसर्गिक मृत्युची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. मात्र, अद्याप मृत व्यक्तीची ओळख पटू शकलेली नाही. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून पोलीस मृताच्या नातेवाईकांचा शोध घेत आहेत.
रेल्वे प्रशासनाचे प्रवाशांना आवाहन
वंदे भारत सारख्या सेमी-हाय-स्पीड गाड्या स्थानकावरून जाताना वाऱ्याच्या वेगाने येतात. अशा वेळी प्लॅटफॉर्मच्या पिवळ्या रेषेच्या आत राहणे अनिवार्य आहे. भविष्यात असे अपघात टाळण्यासाठी प्रवाशांनी प्लॅटफॉर्मच्या कडेपासून सुरक्षित अंतर राखावे आणि रेल्वे नियमांचे पालन करावे, असे आवाहन दानापूर विभागाच्या रेल्वे अधिकाऱ्यांनी केले आहे.