मी पुस्तकातील संदर्भ दिला, तर मला संसदेत बोलण्यापासून रोखले जाते; राहुल गांधींचा केंद्रावर निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2026 17:44 IST2026-02-02T17:44:11+5:302026-02-02T17:44:45+5:30
Parliament Budget Session 2026 : राहुल गांधींच्या चीनबाबत केलेल्या दाव्यामुळे नवीन वादाला तोंड फुटले आहे.

मी पुस्तकातील संदर्भ दिला, तर मला संसदेत बोलण्यापासून रोखले जाते; राहुल गांधींचा केंद्रावर निशाणा
Parliament Budget Session 2026 : डोकलामच्या मुद्द्यावरुन लोकसभेत आज(मंगळवार) जोरदार गदारोळ झाला. अर्थसंकल्पीय अधिवेशनात राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेदरम्यान, विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी एका पुस्तकाचा उल्लेख करत, चीन भारतात घुसल्याचा दावा केला. यावर सत्ताधारी भाजपने तीव्र अक्षेप नोंदवला. या सर्व गोंधळामुळे सभागृह मंगळवारपर्यंत तहकूब करण्यात आले आहे.
राष्ट्रीय सुरक्षेवर बोलू दिले जात नाही
दरम्यान, सभागृह तहकूब झाल्यानंतर राहुल गांधी यांनी संसद भवनाबाहेर माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आरोप केला की, राष्ट्रीय सुरक्षेसारख्या गंभीर विषयावर मला लोकसभेत बोलू दिले जात नाही.
पूर्व सेना प्रमुख का बयान उजागर कर देगा कि मोदी जी और राजनाथ जी ने सेना को कैसे निराश किया।
— Rahul Gandhi (@RahulGandhi) February 2, 2026
अपने पर्दाफ़ाश के डर से वो मुझे संसद में बोलने नहीं दे रहे। pic.twitter.com/RfznNHSLmx
नरवणे यांच्या पुस्तकाचा संदर्भ देत राहुल गांधींचे आरोप
राहुल गांधी म्हणाले, मी जे सांगत आहे, ते माझे मत नाही. हे माजी लष्करप्रमुख मनोज मुकुंद नरवणे यांनी त्यांच्या पुस्तकात लिहिले आहे. मात्र त्या पुस्तकाला प्रकाशित होण्याची परवानगी दिली जात नाही. ते आजही प्रलंबित आहे. हा माजी लष्करप्रमुखांचा दृष्टिकोन आहे. मग सरकारला नेमकी भीती कशाची आहे?
लोकांनी ते पुस्तक वाचले तर पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि लष्कराबाबतची सत्य परिस्थिती समजेल. मी काहीही लिहिलेले नाही. माजी लष्करप्रमुख नरवणे यांनीच हे पुस्तक लिहिले आहे. मी फक्त एका लेखाचा संदर्भ देत आहे. तरीही मला संसदेत बोलण्यापासून रोखले जात आहे, असा आरोप राहुल गांधी यांनी केला.
भाजपकडून माजी लष्करप्रमुखांचा जुना व्हिडीओ शेअर
दरम्यान, भारतीय जनता पार्टीने (भाजप) सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर नरवणे यांचा एक जुना व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये नरवणे म्हणताना दिसतात की, डोकलाम वादाच्या काळात भारताची एक इंचही जमीन गमावलेली नाही. परिस्थिती संघर्षापूर्वी जशी होती, तशीच आहे. भाजपने हा व्हिडीओ शेअर करत राहुल गांधींच्या दाव्यांना विरोध केला आहे.