'जगाची दिशाभूल करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न फसलाय', 'त्या' आरोपांवरून भारताने तिखट शब्दात सुनावले
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2025 19:31 IST2025-05-21T19:30:33+5:302025-05-21T19:31:41+5:30
India on khuzdar blast: असंतोषाने धुमसत असलेल्या बलुचिस्तानातील खुजदारमध्ये बॉम्बस्फोट झाला. या घटनेमागे भारताचा हात असल्याचा कांगावा पाकिस्तानने केला. त्यानंतर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने पाकिस्तानला तिखट शब्दात सुनावले.

'जगाची दिशाभूल करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न फसलाय', 'त्या' आरोपांवरून भारताने तिखट शब्दात सुनावले
India Pakistan News: पाकिस्तानातील बलुसिस्तान प्रांतामध्ये बॉम्बस्फोटाची घटना घडली. बुधवारी झालेल्या या बॉम्बस्फोटात चार मुलांसह पाच जणांचा मृत्यू झाला. शाळेच्या बसमध्येच बॉम्बस्फोट घडवून आणण्यात आला. या घटनेमागे भारताचा हात असल्याचा कांगावा पाकिस्तानने केला. त्यावर भारताने पाकिस्तानची चांगलीच कानउघाडणी केली.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
खुजदारमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटा प्रकरणी पाकिस्तानने केलेले दावे भारताने फेटाळून लावले आहेत. जगातील दहशतवाद्यांचा केंद्रबिंदू असलेल्या पाकिस्तानचे आरोप बिनबुडाचे असल्याचे भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. पाकिस्तान स्वतःच्या मुद्द्यांवरून जगाची दिशाभूल करण्यासाठी अशा गोष्टी करतो, अशा शब्दात भारताने सुनावले.
'पाकिस्तानच प्रयत्न फसलाय', भारताने सुनावले
भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जायसवाल यांनी पाकिस्तानने केलेल्या कांगाव्याला उत्तर दिले आहे.
वाचा >>ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानपेक्षा अधिक बिथरला चीन; भारताविरोधात टाकले ४ नवे डाव
"खुजदारमध्ये आज घडलेल्या घटनेमध्ये भारतीयाचा सहभाग असल्याचा पाकिस्तानाचा बिनबुडाचा आरोप भारत फेटाळून लावतो. या घटनेतील मृतांप्रती भारत तीव्र दुःख व्यक्त करतो. दहशतवाद्यांचे जागतिक केंद्र असल्याची आपली प्रतिमेवरून लक्ष भरकटवण्यासाठी आणि स्वतःचे अपयश लपवण्याची पाकिस्तानची ही सवय झाली आहे. पाकिस्तान त्याच्या देशातंर्गत समस्यांबद्दल भारताला दोषी ठरवत असतो, ही त्याची सवय आहे. पण, जगाची दिशाभूल करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न पूर्णपणे फसला आहे', अशा शब्दात भारताने पाकिस्ताना खडेबोल सुनावले आहेत.
बॉम्बस्फोटाची कुणी घेतली जबाबादरी?
पाकिस्तानातील खुजदारमध्ये शाळेच्या बसमध्ये झालेल्या स्फोटात चार विद्यार्थ्यांना जीव गमवावा लागला. ही शाळा लष्कराकडून चालवण्यात येते. ज्यावेळी बसमध्ये स्फोट झाला, त्यावेळी बसमधून ४० विद्यार्थी प्रवास करत होते.
याच घटनेवरून पाकिस्तानी लष्कर आणि पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी भारतावर आरोप केले होते. या घटनेमध्ये भारताचा सहभागा असल्याचे ते म्हणाले होते. त्याला भारताकडून उत्तर देण्यात आले. दरम्यान, बॉम्बस्फोटाची जबाबदारी पाकिस्तानातील तहरीक ए तालिबान पाकिस्तान या दहशतवादी संघटनेने घेतली आहे.