पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2025 23:56 IST2025-04-27T23:54:55+5:302025-04-27T23:56:46+5:30
Pakistan Deadline to leave India: अंतिम मुदतीनंतर कोणताही पाकिस्तानी नागरिक भारतात दिसला तर..., जाणून घ्या

पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
Pakistan Deadline to leave India: पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध आणखी बिघडले आहेत. भारतानेपाकिस्तान विरुद्ध कठोर पावले उचलली आहेत. पाकिस्तानी नागरिकांना भारतातून निघून जाण्यास सांगितले आहे. तसेच व्हिसाही रद्द करण्यात आले आहेत. पहलगाम हल्ल्यानंतर भारताने जाहीर केले होते की पाकिस्तानी नागरिकांना दिलेले सर्व व्हिसा २७ एप्रिलपासून रद्द मानले जातील. पाकिस्तानी नागरिकांना दिलेले वैद्यकीय व्हिसा २९ एप्रिलपर्यंत वैध आहेत. याचा अर्थ पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याची शेवटची तारीख २९ एप्रिल आहे. जे पाकिस्तानी निर्धारित वेळेत भारत सोडणार नाहीत, त्यांना मोठी किंमत मोजावी लागणार आहे.
काय होणार शिक्षा?
जर अंतिम मुदतीनंतर कोणताही पाकिस्तानी नागरिक भारतात दिसला तर त्या नागरिकाला अटक केली जाईल. त्याच्यावर खटला चालवला जाईल आणि त्याला तीन वर्षांपर्यंत तुरुंगवास किंवा ३ लाख रुपये दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात असे स्पष्ट करण्यात आले आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने हे पाऊल उचलले आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यात किमान २६ जणांचा मृत्यू झाला आणि अनेक जण जखमी झाले. यानंतर, भारत सरकारने कठोर आणि मोठी कारवाई केली आणि सर्व पाकिस्तानींचे व्हिसा रद्द केले. इमिग्रेशन अँड फॉरेनर्स अँक्ट २०२५ नुसार, निर्धारित कालावधीपेक्षा जास्त काळ परदेशात राहणे, व्हिसा अटींचे उल्लंघन करणे किंवा प्रतिबंधित क्षेत्रात अनधिकृत प्रवेश केल्यास तीन वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि ३ लाख रुपयांपर्यंत दंडाच्या शिक्षेची तरतूद आहे.
गृहमंत्री अमित शहा यांनी दिल्या कडक सूचना
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शुक्रवारी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोनवरून कडक सूचना दिल्या होत्या. पाकिस्तानी नागरिकांनी देश सोडण्यासाठी दिलेल्या निर्धारित वेळेत भारतातून निघून जावे, कोणालाही त्यापेक्षा जास्त काळ भारतात राहू दिले जाऊ नये याची खात्री करण्यास सर्व मुख्यमंत्र्यांना सांगितले गेले होते. सार्क व्हिसाधारकांना २६ एप्रिलपर्यंत भारत सोडण्याचे आदेश देण्यात आले होते, तर वैद्यकीय व्हिसा धारकांना २९ एप्रिलपर्यंत वेळ देण्यात आला आहे.
हल्ल्यानंतर आतापर्यंत किती पाकिस्तानी नागरिक भारताबाहेर गेले?
२४ एप्रिलपासून ५३१ पाकिस्तानी नागरिकांनी भारत सोडला आहे. ते त्यांच्या देशात परतले आहेत. तर ८४३ भारतीय नागरिक पाकिस्तानमधून भारतात परतले आहेत. रविवारी २३७ पाकिस्तानी नागरिक भारतातून पाकिस्तानात परतले आणि ११६ भारतीय नागरिक पाकिस्तानातून भारतात परतले.