"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2025 18:15 IST2025-06-16T18:15:13+5:302025-06-16T18:15:47+5:30
बिलावर म्हणाले, 'पाकिस्तान आणि भारत यांच्यातील सर्व प्रलंबित मुद्दे केवळ व्यापक चर्चेद्वारेच सोडवले जाऊ शकतात. जर भारत चर्चेसाठी टेबलावर आला नाही तर...!

"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री तथा पाकिस्तान पीपल्स पार्टीचे (पीपीपी) प्रमुख बिलावल भुट्टो झरदारी यांनी भारताला काश्मीर, सिंधू पाणी करार आणि दहशतवादाच्या मुद्द्यावर चर्चा करण्याचे आवाहन केले आहे. तसेच, हे प्रश्न व्यापक चर्चेद्वारेच सोडवले जाऊ शकतात, असेही बिलावर यांनी म्हटले आहे. याच वेळी त्यांनी, जर सिंधू पाणी करारावरील स्थगिती उठवली गेली नाही तर, पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही, अशी पोकळ धमकीही दिली आहे.
'एक्सप्रेस ट्रिब्यून' वृत्तपत्रातील वृत्तानुसार,
पाश्चात्य देशांच्या दोऱ्यावर संसदीय प्रतिनिधिमंडळाचे नेतृत्व करत असलेल्या बिलावर यांनी रविवारी (15 जून, 2025) ब्रसेल्स दौऱ्यादरम्यान जर्मन प्रसारक 'डॉईश वेले उर्दू' ला दिलेल्या मुलाखतीत हे भाष्य केले आहे.
बिलावर म्हणाले, 'पाकिस्तान आणि भारत यांच्यातील सर्व प्रलंबित मुद्दे केवळ व्यापक चर्चेद्वारेच सोडवले जाऊ शकतात. जर भारत चर्चेसाठी टेबलावर आला नाही तर, ते त्यांच्या हिताचे ठरणार नाही. पाकिस्तानचा पाणीपुरवठा खंडित करण्याच्या भारताच्या कोणताही प्रयत्नाकडे अस्तित्वाला धोका म्हणून पाहिले जाईल. परिणामी, पाकिस्तानला युद्धाशिवाय दुसरा पर्याय राहणार नाही.
पीपीपी अध्यक्ष म्हणाले, पाकिस्तानला युद्ध नको आहे. परंतु तो राष्ट्रीय सुरक्षेशी किंवा पाण्याच्या हक्कांशी तडजोड करणार नाही. पाकिस्तान शांततेचा पुरस्कार करत राहील, मात्र पाणी सुरक्षेसारख्या मुद्द्यांवर कोणतीही तडजोड केली जाऊ शकत नाही.
एक दिवस आधीच, बिलावल भुट्टो झरदारी यांनी आंतरराष्ट्रीय समुदायाला भारताला वाटाघाटीच्या टेबलावर आणण्याचे आवाहन केले होते. तत्पूर्वी, भारताने स्पष्ट केले आहे की, आपण पाकिस्तानसोबत केवळ पीओके (पाकव्याप्त काश्मीर) परत देण्यासंदर्भात आणि दहशतवादासंदर्भातच चर्चा करणार.