लक्ष्य साध्य झाले पण 'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरुच; हवाई दलाने दिली मोठी अपडेट...
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2025 13:38 IST2025-05-11T13:37:08+5:302025-05-11T13:38:17+5:30
Operation Sindoor: भारत-पाकिस्तानमध्ये युद्धविराम जाहीर झाली असला तरी, ऑपरेशन सिंदूरबाबत हवाई दलाने सूचक विधान केले आहे.

लक्ष्य साध्य झाले पण 'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरुच; हवाई दलाने दिली मोठी अपडेट...
India Pakistan Ceasefire: भारत आणि पाकिस्तानमधील तणाव कमी करण्यासाठी काल(10 मे) सायंकाळी युद्धविरामची घोषणा करण्यात आली. पण, आता पाकिस्तानसोबत युद्धविराम जाहीर झाल्यानंतर भारतीय हवाई दलाने एक मोठे विधान केले आहे. भारतीय हवाई दलाचे म्हणणे आहे की, ऑपरेशन सिंदूर अजूनही सुरू असून, येत्या काळात यासंबंधी अधिक माहिती दिली जाईल.
हवाई दलाने त्यांच्या सोशल मीडिया हँडल X वर म्हटले की, "भारतीय हवाई दलाने (IAF) ऑपरेशन सिंदूर अंतर्गत नेमून दिलेली सर्व कामे अचूकतेने आणि जबाबदारीने यशस्वीरित्या पूर्ण केली आहेत. ही कारवाई देशाच्या हिताच्या अनुषंगाने विचारपूर्वक आणि काळजीपूर्वक पार पाडण्यात आली. ही कारवाई अजूनही सुरू असल्याने त्याची संपूर्ण माहिती लवकरच दिली जाईल." हवाई दलाने लोकांना कुठल्याही प्रकारची अफवा टाळण्याचेही आवाहन केले आहे.
The Indian Air Force (IAF) has successfully executed its assigned tasks in Operation Sindoor, with precision and professionalism. Operations were conducted in a deliberate and discreet manner, aligned with National Objectives.
— Indian Air Force (@IAF_MCC) May 11, 2025
Since the Operations are still ongoing, a detailed…
भारत-पाकिस्तानमध्ये युद्धविराम
शनिवारी (10 मे 2025) संध्याकाळी परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, पाकिस्तानच्या आवाहनावरुन दोन्ही देशांमध्ये युद्धबंदी लागू करण्यात आली आहे. पण, तीन तासांच्या आत पाकिस्तानने युद्धविरामचे उल्लंघन केले आणि जम्मू-काश्मीरसह अनेक ठिकाणी ड्रोन आणि क्षेपणास्त्रे डागली. पाकिस्तानच्या या कृत्याला भारतानेही चोख प्रत्युत्तर दिले आणि सर्व क्षेपणास्त्रे आणि ड्रोन हाणून पाडले. मात्र, रात्री 10 वाजल्यानंतर पाकिस्तानकडून कोणतीही हालचाल दिसली नाही.
डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रुथ सोशलवरील पोस्टद्वारे दोन्ही देशांमधील युद्धविरामची माहिती दिली. त्यांनी लिहिले की, दोन्ही देशांनी परस्पर संमतीने हा करार केला आहे. आनंद आहे की अमेरिकेने दोन्ही देशांमधील तणाव कमी करण्यासाठी काम केले. यानंतर अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनीही भारत आणि पाकिस्तानमधील युद्धविरामची माहिती दिली.