१०-१२ नाही तर तब्बल २८ ठिकाणी भारताने केला हल्ला, विव्हळणाऱ्या पाकिस्तानने स्वत: दिली कबुली
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2025 15:43 IST2025-06-03T15:43:10+5:302025-06-03T15:43:36+5:30
Operation Sindoor:

१०-१२ नाही तर तब्बल २८ ठिकाणी भारताने केला हल्ला, विव्हळणाऱ्या पाकिस्तानने स्वत: दिली कबुली
पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताच्या सैन्यदलांनी ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या अड्ड्यांना लक्ष्य केले होते. तसेच भारताच्या या कारवाईला पाकिस्तानने प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केल्यावर भारतीय सैन्यदलांनी पाकिस्तानच्या अनेक हवाई तळांना उद्ध्वस्त केले होते. भारतीय सैन्यदलांनी केलेल्या या हल्ल्यामुळे पाकिस्तानला जबरदस्त हादरा बसला होता. तसेच पाकिस्तानच्या लष्कराने युद्धविरामासाठी विनवणी सुरू केली होती. दरम्यान, ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारताने पाकिस्तानवर केलेल्या जबर आघाताची कबुली आता पाकिस्ताननेच दिली आहे.
पाकिस्तानकडून तयार करण्यात आलेल्या ऑपरेशन बुनयान उन मर्सूससंबंधित कागदपत्रांमधील उल्लेखानुसार भारताने पाकिस्तानमधील आणखी आठ ठिकाणांना लक्ष्य केलं आहे. या ठिकाणांचा उल्लेख भरातीय हवाई दल आणि डीजीएमओ यांनी ७ मे रोजी करण्यात आलेल्या एअरस्ट्राईकनंतर घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत केलेला नाही.
पाकिस्तानने तयार केलेल्या कागदपत्रांमध्ये ज्या शहरांवर हल्ला झाल्याचा नव्याने उल्लेख करण्यात आला आहे, त्यामध्ये पेशावर, झंग, सिंधमधील हैदराबाद, पंजाब प्रांतातील गुजरात, गुजरांवाला, बहावलनगर, अटक आणि छोर यांचा समावेश आहे. या भागात हल्ला झाल्याचे डोजियरमध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या नकाशामधून समोर आलं आहे. त्यामाध्यमातून भारताने केलेल्या हल्ल्याची तीव्रता लक्षात येते. भारताने या कारवाईसाठी ब्राह्मोस क्षेपणास्त्रांचा वापर केला होता. तसेच या क्षेपणास्त्रांसमोर पाकिस्तानी सैन्य हतबल झाल्याचं दिसून आलं होतं.
नव्याने समोर आलेल्या या माहितीमुळे भारतीय सैन्यदलाने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून केलेली कारवाई ही आधी वर्तवण्यात येत असलेल्या अंदाजांपेक्षा अधिक व्यापक आणि तीव्र असल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच या माहितीमुळे पाकिस्तानकडून भारताला झालेल्या मोठ्या प्रमाणावरील नुकसानाबाबत करण्यात येत असलेला दावाही खोटा असल्याचे उघड झाले आहे.
पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याचा बदला म्हणून भारताने ७ मे रोजी ऑपरेशन सिंदूरअंतर्गत प्रत्युत्तरदाखल कारवाई केली होती. तेव्हा भारतीय सैन्यदलांकडून बहावलपूर येथील जैश ए मोहम्मदचा अड्डा, मुरिदके येथील लष्कर ए तोयबा याचं प्रशिक्षण केंद्र यांना प्रामुख्याने लक्ष्य करण्यात आल्याचे सांगण्यात आले होते. तसेच मुझफ्फराबाद, कोटली, रावलकोट, चाकस्वारी, भिंबर, नीलम खोरे, झेलम आणि चकवाल येथील अड्ड्यांनाही लक्ष्य करण्यात आले होते.
भारताने केलेल्या या कारवाईनंतर पाकिस्तानकडून प्रतिहल्ल्याचा प्रयत्न झाल्यावर भारताने पाकिस्तानी हवाई दलाच्या नूर खान, रफिकी, मुरिद, सुक्कूर, सियालकोट, पसरूर, चुन्नियन, सरगोधा, स्कर्दू, भोलारी आणि जेकोबाबाद या हवाई तळांना लक्ष्य करत मोठ्या प्रमाणावर विध्वंस घडवला होता. त्यामुळे पाकिस्तानला तीन दिवसांच्या आतच युद्धविरामासाठी विनवणी करावी लागली होती.