Odisha Train Accident : ओडिशातील भीषण रेल्वे अपघाताचे कारण काय? रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली माहिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2023 10:44 IST2023-06-03T09:21:48+5:302023-06-03T10:44:49+5:30
ओडिशा रेल्वे दुर्घटनेत स्थानिक दलांव्यतिरिक्त लष्कर आणि हवाई दलही बचावकार्यात काम करत आहेत.

Odisha Train Accident : ओडिशातील भीषण रेल्वे अपघाताचे कारण काय? रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली माहिती
काल सायंकाळी सात वाजता ओडिशा येथे रेल्वेचा भीषण अपघात झाला. या अपघातात आतापर्यंत २३७ जणांचा मृत्यू झाला आहे आणि ९०० हून अधिकजण जखमी झाले. या अपघातात बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. स्थानिक दलांव्यतिरिक्त लष्कर आणि हवाई दलही बचाव कार्यात आहेत. जखमींना हवाई दलाच्या हेलिकॉप्टरच्या मदतीने बाहेर काढले जात आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव शनिवारी सकाळी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या भीषण रेल्वे अपघातामागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. यासाठी चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे, अशी माहिती रेल्वेमंत्र्यांनी दिली.
ओडिशातील बालासोर भागात झालेल्या भीषण रेल्वे अपघातात शुक्रवारी रात्रीपासून बचावकार्य सुरू आहे. दोन पॅसेंजर ट्रेन आणि मालगाडी यांच्यात झालेल्या भीषण टक्करनंतर १० हून अधिक बोगी रुळावरून घसरल्या. या भीषण अपघातातील मृतांचा आकडा सातत्याने वाढत आहे. या अपघातात २८० जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर ९०० हून अधिक जखमी झाले आहेत. स्थानिक पोलीस, प्रशासनासह एनडीआरएफ आणि लष्कराचे जवान रात्रीपासून मदतकार्य करत आहेत.
रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव शनिवारी सकाळी बचावकार्याची माहिती घेतली. यावेळी अश्विनी वैष्णव म्हणाले, अपघातातील जखमी आणि मृतांच्या नातेवाईकांना नुकसान भरपाई जाहीर करण्यात आल्याचे सांगितले. बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. रेल्वे मंत्रालय, केंद्र आणि राज्य सरकार आपापल्या स्तरावर जखमींना सर्वतोपरी मदत करत आहेत.
या भीषण रेल्वे अपघाताचे कारण काय, असा प्रश्न रेल्वेमंत्र्यांना विचारण्यात आला. यावर ते म्हणाले की, हे अद्याप स्पष्ट झाले नसून, रेल्वे मंत्रालयाने याप्रकरणी चौकशी समिती स्थापन केली आहे. समिती संपूर्ण प्रकरणावर लक्ष ठेवून आहे. या अपघातात जो कोणी दोषी असेल त्याला सोडले जाणार नाही. आपण स्वतः या प्रकरणाच्या तळाशी जाणार असून निकाल लागेपर्यंत गप्प बसणार नसल्याचे त्यांनी सांगितले.