आयएसआयचे १५० दहशतवाद्यांना फर्माननवी दिल्ली : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या नियोजित भारत दौऱ्यापूर्वी भारतात आत्मघाती हल्ले करण्याचे फर्मान आयएसआय या पाकिस्तानी गुप्तचर संस्थेने १५० कडव्या दहशतवाद्यांना सोडल्याची खात्रीलायक माहिती आहे. ओबामा २६ जानेवारीला नवी दिल्लीत भारताच्या प्रजासत्ताक दिन कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या या भेटीत अडथळा निर्माण करण्याच्या दृष्टीने भारतात दहशतवादी कारवाया करण्याची पाकिस्तानची इच्छा असून, त्यासाठी आयएसआयने लष्कर-ए-तय्यबा व इतर संघटनांच्या दहशतवाद्यांना भारतात हल्ले करण्याचे आदेश दिले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गतवर्षी अर्निया सेक्टरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याप्रमाणे पुन्हा हल्ले घडवून आणण्याचा आयएसआयचा डाव आहे. त्यासाठी लष्कर-ए-तय्यबाचे ६० दहशतवादी सियालकोट येथे आले आहेत. भारतीय सीमेवर गोळीबार करण्याच्या आडून पाकिस्तान या दहशतवाद्यांना भारतात घुसविण्याच्या प्रयत्नात आहे. अर्नियामध्ये गतवर्षी झालेल्या हल्ल्यात दहशतवादी व भारतीय जवान यांच्यात अनेक तास चकमक चालली होती. त्यात तीन जवान शहीद झाले होते व तीन नागरिक आणि तीन दहशतवादी मारले गेले होते. (लोकमत न्यूज नेटवर्क)निवडणुकीत अपयशभारतात जम्मू-काश्मीरमधील निवडणुकीत मतदारांमध्ये दहशत निर्माण करण्याची जबाबदारी लष्करवर टाकण्यात आली होती, पण लष्करला त्यात यश मिळाले नाही. मतदार निर्भयपणे बाहेर पडले व मोठ्या प्रमाणावर मतदान झाले. त्यामुळे आयएसआय लष्करवर नाराज आहे. या अपयशाचे उट्टे काढण्यासाठी जानेवारीत भारतात धुडगूस घालण्याची जबाबदारी आता व्यवस्थित पार पाडण्याचे लष्करने ठरवले आहे.
ओबामांच्या दौऱ्याआधी करा भारतात हल्ले
By admin | Updated: January 7, 2015 02:38 IST