पहलगामच्या हल्ल्यात ३ नव्हे ४ दहशतवादी होते सामील; चौथा काय करत होता? ऐकून येईल चीड!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2025 13:39 IST2025-06-24T13:38:25+5:302025-06-24T13:39:19+5:30
पहलगाम हल्ल्यात ३ नव्हे, तर ४ दहशतवादी थेट सामील होते. चौथ्या दहशतवाद्याची भूमिकाही तपासात उघड झाली आहे.

पहलगामच्या हल्ल्यात ३ नव्हे ४ दहशतवादी होते सामील; चौथा काय करत होता? ऐकून येईल चीड!
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यासंदर्भात पाकिस्तानचा सहभाग समोर आला आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या तपासात असे म्हटले आहे की, पहलगाम हल्ल्यात ३ नव्हे, तर ४ दहशतवादी थेट सामील होते. चौथ्या दहशतवाद्याची भूमिकाही तपासात उघड झाली आहे, तो दहशतवादी फारूक अहमद तडवा आहे.
बीबीसी उर्दूने तपास अहवालाचा हवाला देत म्हटले आहे की, फारूक हल्ल्याच्या दिवशी पाकव्याप्त काश्मीरमधून (PoK) संपूर्ण घटनेवर लक्ष ठेवून होता. जोपर्यंत दहशतवाद्यांनी पहलगाममध्ये धुमाकूळ घातला होता, तोपर्यंत फारूक पाकव्याप्त काश्मीरमध्ये सक्रिय होता. तडवा पाकव्याप्त काश्मीरमध्ये बसून पहलगाम हल्ल्यातील रक्तपात बघत होता.
तीन दहशतवाद्यांचे रेखाचित्र जारी
पहलगाम हल्ल्यानंतर तीन दहशतवाद्यांची रेखाचित्रे जारी करण्यात आली होती. यामध्ये आदिल हुसैन टोकर (अनंतनाग), हाशिम मूसा आणि अली भाई यांच्या नावांचा समावेश होता. हाशिम मूसा हा पहलगाम हल्ल्याचा मुख्य हल्लेखोर होता. मूसा हा पाकिस्तानी सैन्यात जवान म्हणूनही काम करत होता.
बसरण घाटात गोळीबार करण्यापूर्वी, मूसा आणि त्याच्या साथीदारांनी एका ठिकाणी आश्रय घेतला होता. तपास यंत्रणेने आश्रय देणाऱ्या दोन स्थानिक व्यक्तींनाही अटक केली आहे. या दोघांना न्यायालयात हजर करण्यात आले आहे.
लष्कर-ए-तैयबाने रचला होता कट, मुख्यालय उद्ध्वस्त!
पहलगाम हल्ल्याचा कट लष्कर-ए-तैयबाने रचला होता. हाफिज सईद, पाकिस्तानी लष्कर आणि गुप्तहेर यंत्रणा यांनी एकत्र येऊन हल्ल्याची योजना आखल्याचा आरोप आहे. पहलगाम हल्ल्यात २६ निष्पाप भारतीय नागरिकांचा बळी गेला होता.
पहलगाम हल्ल्यानंतर भारताने लष्कर आणि जैशच्या दहशतवादी ठिकाणांचा विध्वंस केला होता. लष्कर-ए-तैयबाचे मुख्यालय पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील मुरीदके येथे होते, ज्यावर भारताने 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत क्षेपणास्त्र हल्ला केला. पहलगाम हल्ल्यापासून लष्करचा प्रमुख हाफिज सईद आणि जैश प्रमुख मसूद अझर भूमिगत आहेत.
कोण आहे फारूक अहमद तडवा?
लष्कर-ए-तैयबाचा दहशतवादी फारूकचे घर जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा येथे आहे. दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी होण्यासाठी फारूक कुपवाडा सोडून पाकव्याप्त काश्मीरमध्ये स्थलांतरित झाला होता. त्याच्या कुटुंबियांचे म्हणणे आहे की, त्याने १९९०मध्येच घर सोडले होते. तडवा सध्या लष्करचा कमांडर आहे. तडवा यापूर्वीही खोऱ्यातील अनेक दहशतवादी कारवायांमध्ये सामील होता.