भारत-ब्राझील मैत्रीचा नवा अध्याय : २० अब्ज डॉलरच्या व्यापाराचे लक्ष्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2026 06:10 IST2026-02-22T06:07:09+5:302026-02-22T06:10:32+5:30
नवी दिल्ली: भारत आणि ब्राझीलने येत्या पाच वर्षांत वार्षिक २० अब्ज डॉलरच्या व्यापाराचे उद्दिष्ट ठेवले आहे. या संदर्भात शनिवारी ...

भारत-ब्राझील मैत्रीचा नवा अध्याय : २० अब्ज डॉलरच्या व्यापाराचे लक्ष्य
नवी दिल्ली: भारत आणि ब्राझीलने येत्या पाच वर्षांत वार्षिक २० अब्ज डॉलरच्या व्यापाराचे उद्दिष्ट ठेवले आहे. या संदर्भात शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष लुईझ इनासिओ लुला द सिल्व्हा यांच्यात सविस्तर चर्चा झाली. दोन्ही देशांनी या बैठकीत 'महत्त्वपूर्ण खनिजां'बाबत करारही केला. हा करार दोन्ही देशांच्या भविष्यातील पुरवठा साखळीसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. याशिवाय, संरक्षण, अक्षय ऊर्जा, डिजिटल क्षेत्रांत सहकार्य वाढवण्यावर दोन्ही नेत्यांचे एकमत झाले.
'खनिज' करार : भारतासाठी गेमचेंजर
दोन्ही देशांनी महत्त्वपूर्ण खनिजे आणि 'रेअर अर्थ' (दुर्मीळ खनिजे) क्षेत्रातील सहकार्यासाठी स्वाक्षरी केली आहे. सेमीकंडक्टर, इलेक्ट्रिक वाहने आणि हाय-टेक उपकरणांसाठी ही खनिजे आवश्यक असतात. यामुळे भारताला पुरवठा साखळीत सक्षम पर्याय उपलब्ध होईल.
२० अब्ज डॉलरच्या व्यापाराचा संकल्प : २०२४-२५ मध्ये हा व्यापार १२ अब्ज डॉलर होता. पुढील पाच वर्षांत तो २० अब्ज डॉलरवर नेण्याचे लक्ष्य आहे.
दहशतवादाविरोधात एकजूट
मोदी आणि लुला यांनी दहशतवादाचा कडाडून निषेध केला. दहशतवाद आणि त्याचे समर्थक मानवतेचे शत्रू आहेत, अशा शब्दांत मोदींनी ठणकावले. तर, लुला यांनी काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यांचा निषेध करत दहशतवादाला कोणत्याही धर्माशी जोडू नये, असे स्पष्ट केले.
'टाइपरायटर ते सॉफ्टवेअर'
लुला यांनी मोर्दीच्या एका विधानाचा संदर्भ देत संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत सुधारणा करण्याची मागणी केली. २१ व्या शतकातील सॉफ्टवेअर २० व्या शतकातील टाइपरायटरवर चालू शकत नाही, असे म्हणत त्यांनी दोन्ही देश हे नैसर्गिक उमेदवार असल्याचे सांगितले.