मालेगाव बॉम्बस्फोट; कधी अन् कसा झाला? किती लोक मृत्यूमुखी पडले? जाणून घ्या पूर्ण टाईमलाईन

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2025 13:29 IST2025-07-31T13:28:44+5:302025-07-31T13:29:14+5:30

Malegaon bomb blast: मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात आज १७ वर्षांनी निकाल आला आहे.

Malegaon bomb blast: When and how did it happen? How many people died? Know the complete timeline | मालेगाव बॉम्बस्फोट; कधी अन् कसा झाला? किती लोक मृत्यूमुखी पडले? जाणून घ्या पूर्ण टाईमलाईन

मालेगाव बॉम्बस्फोट; कधी अन् कसा झाला? किती लोक मृत्यूमुखी पडले? जाणून घ्या पूर्ण टाईमलाईन

Malegaon bomb blast: मालेगाव येथे २००८ साली झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणात १७ वर्षांनी आज(दि.31) निकाल आला आहे. या प्रकरणात एनआयएच्या विशेष न्यायालयाने सर्व सात आरोपींची निर्दोष मुक्तता केली. या प्रकरणातील मुख्य आरोपी भोपाळच्या माजी खासदार प्रज्ञासिंह ठाकूर होत्या. त्यांच्या व्यतिरिक्त लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहितांसह ७ आरोपी होते, ज्यांच्यावर दहशतवादी कट रचणे, खून करणे, धार्मिक उन्माद पसरवणे असे आरोप होते. 

संपूर्ण प्रकरण काय आहे?
नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथे सुमारे १७ वर्षांपूर्वी २९ सप्टेंबर २००८ रोजी बॉम्बस्फोट झाला होता. या स्फोटात ६ जणांचा मृत्यू झाला होता. याशिवाय १०० हून अधिक लोक जखमी झाले होते. रमजानमध्ये लोक नमाज अदा करण्यासाठी जात असताना हा स्फोट करण्यात आला होता. त्यामुळेच जखमींची संख्या जास्त होती. हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी, ३० सप्टेंबर २००८ रोजी, मालेगावच्या आझादनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यावेळी, ३०७, ३०२, ३२६, ३२४, ४२७, १५३-अ, १२०ब, स्फोटक कायदा आणि शस्त्रास्त्र कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

प्रज्ञान सिंह मुख्य आरोपी
सुरुवातीला स्थानिक पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला होता, परंतु नंतर संपूर्ण तपास एटीएसकडे सोपवण्यात आला. एलएमएल फ्रीडम (MH15P4572) क्रमांकाच्या दुचाकीमध्ये हा स्फोट झाल्याचे उघड झाले. मात्र, वाहनावर सापडलेला नंबर चुकीचा होता. त्याचा चेसिस नंबर आणि इंजिन नंबर देखील मिटवण्यात आला होता. या प्रकरणाची चौकशी करताना एफएसएल टीमला वाहनाचा योग्य क्रमांक आढळला, ज्यामुळे हे वाहन प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्या नावावर असल्याचे उघड झाले. या घटनेच्या सुमारे एक महिन्यानंतर प्रज्ञा ठाकूरसह आणखी २ जणांना अटक करण्यात आली. संपूर्ण प्रकरणात ११ जणांना अटक करण्यात आली, तर साध्वी प्रज्ञा यांना या प्रकरणात मुख्य आरोपी बनवण्यात आले.

अनेक साक्षीदारांनी साक्ष फिरवली
पोलिस, एटीएस आणि एनआयएने मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाचा तपास केला. संपूर्ण खटल्याच्या सुनावणीदरम्यान ३०० हून अधिक साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आले. जे मुख्य खटल्यात साक्षीदार होते, त्यांनी न्यायालयात साक्ष फिरवली. आतापर्यंत या प्रकरणात ३५ साक्षीदारांनी साक्ष फिरवली आहे. साक्षीदारांनी न्यायालयात सांगितले की, त्यांना बंदुकीच्या धाकावर धमकी देऊन जबाब घेण्यात आले. साक्षीदार वारंवार आपली साक्ष बदलत असल्याबद्दल न्यायालयानेही नाराजी व्यक्त केली होती. मात्र, आता आज १७ वर्षांनंतर या प्रकरणाचा निकाल लागला आहे.

मालेगाव प्रकरणाची टाईमलाईन

  • २९ सप्टेंबर २००८: मालेगावमध्ये बॉम्बस्फोट, ६ जण ठार, १०० हून अधिक जखमी
  • ऑक्टोबर २००८: महाराष्ट्र एटीएसने तपास सुरू केला, प्रज्ञा ठाकूर आणि कर्नल पुरोहित यांच्यासह इतरांना अटक
  • २००९: तपास एनआयएकडे सोपवला
  • २०११: एनआयएने पहिले आरोपपत्र दाखल केले
  • फेब्रुवारी आणि डिसेंबर २०१२: एनआयएने लोकेश शर्मा आणि धनसिंग चौधरी या आणखी दोन जणांना अटक केली. तोपर्यंत एकूण १४ जणांना अटक करण्यात आली होती.
  • फेब्रुवारी २०१६: एनआयएने विशेष न्यायालयाला सांगितले की, त्यांनी या प्रकरणात मकोका तरतुदी लागू करण्याबाबत अॅटर्नी जनरलचे मत मागितले आहे.
  • २०१६: एनआयएने प्रज्ञा आणि इतर ६ जणांविरुद्ध नवीन आरोपपत्र दाखल केले, पुराव्याअभावी मकोका रद्द केला
  • २०१७: सर्वोच्च न्यायालयाने कर्नल पुरोहित यांना जामीन मंजूर केला
  • २५ एप्रिल २०१७: मुंबई उच्च न्यायालयाने प्रज्ञा ठाकूर यांना जामीन मंजूर केला. उच्च न्यायालयाने पुरोहित यांना जामीन देण्यास नकार दिला.
  • २१ सप्टेंबर २०१७: पुरोहित यांना सर्वोच्च न्यायालयाने जामीन दिला. वर्षाच्या अखेरीस सर्व अटक केलेले आरोपी जामिनावर बाहेर आहेत.
  • २७ डिसेंबर २०१७: एनआयएच्या विशेष न्यायालयाने या प्रकरणात आरोपी शिवनारायण कलसांगरा, श्याम साहू आणि प्रवीण मुतालिक नाईक यांची निर्दोष मुक्तता केली.
  • २०१९: मुंबईतील विशेष एनआयए न्यायालयाने या प्रकरणात आरोप निश्चित केले.
  • २०१९: साध्वी प्रज्ञा लोकसभा निवडणूक जिंकल्या, भोपाळमधून खासदार झाल्या.
  • ३ डिसेंबर २०१८: खटल्याची सुरुवात पहिल्या साक्षीदाराच्या साक्षीने झाली.
  • १९ एप्रिल २०२५: विशेष न्यायालयाने सुनावणी पूर्ण केली.
  • ३१ जुलै २०२५: न्यायमूर्ती ए.के. लाहोटी यांनी निकाल दिला.

Web Title: Malegaon bomb blast: When and how did it happen? How many people died? Know the complete timeline

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.