रेल्वे ट्रॅकवर रील बनवताय? मग तुरुंगाची हवा खाण्यास तयार राहा; ट्रेनसमोर रील बनवणाऱ्यांविरुद्ध आरपीएफचा मोठा प्लॅन
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2026 19:55 IST2026-02-06T19:54:32+5:302026-02-06T19:55:20+5:30
सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी रेल्वे ट्रॅकवर जीवघेणे स्टंट करणाऱ्या आणि रील बनवणाऱ्यांना आता रेल्वे पोलिसांनी कडक इशारा दिला आहे.

रेल्वे ट्रॅकवर रील बनवताय? मग तुरुंगाची हवा खाण्यास तयार राहा; ट्रेनसमोर रील बनवणाऱ्यांविरुद्ध आरपीएफचा मोठा प्लॅन
सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी रेल्वे ट्रॅकवर जीवघेणे स्टंट करणाऱ्या आणि रील बनवणाऱ्यांना आता रेल्वेपोलिसांनी कडक इशारा दिला आहे. उत्तर रेल्वेचे सह-प्रधान मुख्य सुरक्षा आयुक्त पंकज गंगवार यांनी मुजफ्फरनगर रेल्वे स्थानकाच्या पाहणीदरम्यान रील बनवणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. अशा कृत्यांमुळे केवळ रेल्वेच्या सुरक्षेला धोका निर्माण होत नाही, तर अनेकांना जीवही गमवावा लागत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सुरक्षा व्यवस्थेचा घेतला आढावा
शुक्रवारी आयजी पंकज गंगवार यांनी मुजफ्फरनगर रेल्वे स्थानक, प्लॅटफॉर्म, फूटओव्हर ब्रिज आणि संवेदनशील भागांची सखोल पाहणी केली. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची स्थिती आणि प्रवाशांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या यंत्रणेचा त्यांनी आढावा घेतला. "प्रवाशांची सुरक्षा ही रेल्वेची सर्वोच्च प्राथमिकता आहे आणि त्यात कोणतीही हलगर्जी खपवून घेतली जाणार नाही," असे त्यांनी यावेळी ठणकावून सांगितले.
आत्महत्या रोखण्यासाठी विशेष गस्त
रेल्वे ट्रॅकवर होणाऱ्या आत्महत्यांच्या घटनांबाबत रेल्वे पोलिसांनी गंभीर पावले उचलली आहेत. ज्या ठिकाणी आत्महत्यांच्या घटनांचे प्रमाण जास्त आहे, अशा संभाव्य जागा चिन्हित करण्यात आल्या आहेत. या ठिकाणी पोलिसांची गस्त वाढवण्याचे आदेश देण्यात आले आहेत, जेणेकरून वेळेत अशा घटना रोखता येतील.
शेतकऱ्यांना महत्त्वाचे आवाहन
सध्याच्या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर, आयजींनी शेतकरी बांधवांनाही विशेष विनंती केली आहे. जर रेल्वे विभागाशी संबंधित कोणतीही समस्या नसेल, तर 'रेल रोको' आंदोलन करू नये किंवा ट्रॅकवर बसून प्रदर्शन करू नये, असे आवाहन त्यांनी केले. रेल्वे ही सर्वांच्या सेवेसाठी आहे, त्यामुळे तिला लक्ष्य करणे चुकीचे असल्याचे त्यांनी नमूद केले.
कर्मचाऱ्यांच्या समस्यांवर चर्चा
या दौऱ्यात गंगवार यांनी आरपीएफ कर्मचाऱ्यांशी संवाद साधला आणि त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. शिस्त, सतर्कता आणि प्रवाशांशी संवेदनशील व्यवहार हीच चांगल्या सुरक्षा व्यवस्थेची ओळख आहे, असे सांगत त्यांनी कर्मचाऱ्यांना प्रोत्साहित केले. याप्रसंगी सुरक्षा आयुक्त चेतन, आरपीएफ इन्स्पेक्टर विनीत गौतम आणि जीआरपीचे अधिकारी उपस्थित होते.